
काँग्रेसने संसदेच्या प्रतिष्ठेचा अवमान केल्याने जालन्यात भाजप आक्रमक, जोरदार निषेध आंदोलन
संसदेचा अवमान हा देशाचा अपमान – भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे
जालना, (प्रतिनिधी) : 12 मार्च 2026 रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्पीय बजेटचे कामकाज सुरू असताना काँग्रेस नेते खा. राहुल गांधी व काँग्रेस तसेच इतर विरोधी पक्षातील काही खासदारांनी संसद परिसरात चहा-बिस्कीटसह चायपार्टी आयोजित केली. संसद ही देशाची सर्वोच्च लोकशाही संस्था असताना अशा प्रकारचे कृत्य करणे हे अत्यंत दुर्दैवी असून संसदेच्या प्रतिष्ठेला धक्का देणारे आहे. तसेच संसदीय नियम व अध्यक्षांच्या आदेशांची अवहेलना करणारी आहे. या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी, जालना च्या वतीने शनिवार दिनांक 14 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6:10 वाजता भाजपा जिल्हा कार्यालय, जालना येथे जोरदार निदर्शने करण्यात आली.
यावेळी बोलताना भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे म्हणाले की, संसदेत केंद्रीय अर्थसंकल्पासारख्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू असताना कॉंग्रेस पक्षातील खासदारांनी संसद परिसरात चायपार्टी आयोजित करणे हे संसदीय परंपरेला धरून नाही. लोकशाही संस्थांची प्रतिष्ठा राखणे ही सर्व लोकप्रतिनिधींची जबाबदारी असताना अशा प्रकारच्या कृत्यामुळे संसदेची मर्यादा भंग होते. संसदेचे नियम व अध्यक्षांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून केलेले हे कृत्य निषेधार्ह असल्याचेही त्यांनी नमूद केले. अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, अशी मागणी भारतीय जनता पार्टी, जालना यांच्या वतीने करण्यात आली.
तसेच देशातील जनतेमध्ये चुकीचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार देशाच्या विकासासाठी सातत्याने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.



