
समाजकल्याण विभाग वंचितांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध – अपर जिल्हाधिकारी रेश्मा माळीसामाजिक समता सप्ताहानिमित्त विविध उपक्रम : ज्येष्ठ नागरिक कार्यशाळा, आरोग्य व रक्तदान शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद
अहिल्यानगर, प्रतिनिधी: दुर्लक्षित व वंचित घटकांच्या कल्याणासाठी शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी समाजकल्याण विभाग सातत्याने कार्यरत आहे. या प्रयत्नांमुळे लाभार्थ्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडत असल्याचे प्रतिपादन जिल्हा जात पडताळणी समितीच्या अध्यक्षा तथा अपर जिल्हाधिकारी श्रीमती रेशमा माळी यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने आयोजित सामाजिक समता सप्ताहांतर्गत सावेडी नाका येथील पुण्यश्लोक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात दि.१३ एप्रिल २०२६ रोजी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सहायक आयुक्त (समाजकल्याण), जिल्हा जात पडताळणी समिती तसेच विविध महामंडळांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये जात पडताळणी प्रमाणपत्रांचे वितरण, ज्येष्ठ नागरिक कार्यशाळा, आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.



