
*विशेष वृत्त**बालसंगोपन योजनेअंतर्गत ९७ लाखांच्या अनुदानाचे वाटप; जिल्हा महिला व बाल विकास विभागाची माहिती*
सातारा, प्रतिनिधी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यातील हजारो बालकांना मोठा आधार मिळाला आहे. सन २०२४-२५ आणि २०२५-२६ या दोन आर्थिक वर्षांत जिल्हा महिला व बाल विकास विभागाने एकूण ४ हजार ३३२ लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ९७ लाख ४७ हजार रुपयांचे अनुदान वर्ग केले आहे.
विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, सन २०२४-२५ मध्ये २ हजार ८९१ लाभार्थ्यांना ६५ लाख ४ हजार ७५० रुपये, तर सन २०२५-२६ मध्ये १ हजार ४४१ लाभार्थ्यांना ३२ लाख ४२ हजार २५० रुपयांचे अनुदान थेट वितरित करण्यात आले आहे.
अनाथ किंवा ज्यांच्या पालकांचा पत्ता लागत नाही व जी बालके दत्तक देणे शक्य नाही अशी बालके. एक पालक असलेली बालके, (एका पालकाचा मृत्यू, घटस्फोट, पालक विभक्तीकरण, परित्याग, अविवाहित मातृत्व, गंभीर आजार, पालक रुग्णालयात असणे, इ. कारणांमुळे कुटुंब विघटीत झालेली, एक पालक असलेली बालके). कुटुंबातील तणाव / तंटे / वादविवाद / न्यायालयीन वाद अशा सारख्या कौटुंबिक संकटात बाधित बालके (Family Crisis). कुष्ठरुग्ण पालकांची बालके, जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची बालके, तुरुंगात असलेल्या पालकांची बालके, एच.आय.व्ही.ग्रस्त पालकांची बालके, कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने बाधित पालकांची बालके. तीव्र मतीमंद बालके, एच.आय.व्ही.ग्रस्त किंवा कॅन्सरग्रस्त बालके, ४०% पेक्षा अधिक अपंगत्व असलेली, अंध, दिव्यांग बालके, भिक्षा मागणारी बालके, पोक्सो अधिनियमांतर्गत बळी पडलेली बालके, तीव्र कुपोषित बालके, सॅमबालके, दुर्धर आजार असलेली बालके, व्यसनाधिन बालके, विविध प्रकारच्या दंगलीनी प्रभावित झालेली बालके, कोविड सारख्या रोगाच्या प्रादुर्भावाने दोन्ही / एक पालक गमावलेली बालके, नैसर्गिक आपत्तीमध्ये दोन्ही / एक पालक गमावलेली बालके, बालविवाहाला बळी पडू शकणारी बालके, विधी संघर्षग्रस्त बालके. दोन्ही पालक दिव्यांग असलेली बालके. रस्त्यावर राहणारी, शाळेत न जाणारी, बालकामगार बालके.८. कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात गुंतलेल्या पालकांची बालके. भिक्षेकरी गृहात दाखल पालकांची बालके अशा बालकांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात येतो.
जिल्ह्यातील गरजू बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या संगोपनासाठी हे अनुदान अत्यंत मोलाचे ठरणार आहे. पात्र बालकांच्या पालकांनी किंवा नातेवाईकांनी आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयाशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
0000



