
राष्ट्रीय जनगणना कार्यक्रमाला प्रारंभ;स्वगणनेचा पहिला टप्पा सुरू पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय शुभारंभ स्वगणना करून राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करण्याचे आवाहन
अकोला, प्रतिनिधी जनगणना हे राष्ट्रीय कार्य आहे. नागरिकांनी दिलेल्या अचूक माहितीवर पुढील 10 वर्षांसाठी जिल्ह्याच्या शाळा, दवाखाने, रस्ते, पाणीपुरवठा योजना, रेशन व्यवस्था व इतर विकासकामांचे नियोजन अवलंबून आहे. त्यामुळे नागरिकांना स्वगणना करून अचूक माहिती द्यावी, तसेच प्रगणकांनाही सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी आज येथे केले.
राष्ट्रीय जनगणना कार्यक्रमाचा जिल्हास्तरीय शुभारंभ व कार्यक्रमाच्या अनुषंगाने पत्रकार परिषद पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झाला, त्यावेळी ते बोलत होते. प्र. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे आदी यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रीय जनगणना कार्यक्रमात स्वगणनेचा टप्पा आजपासून १५ मेपर्यंत चालेल. त्यानंतर प्रगणकांमार्फत दिनांक 16 मे ते 14 जुन 2026 या कालावधीत घरोघरी जाऊन माहिती संकलन केली जाणार आहे. ही प्रक्रिया अत्यंत सुलभ व डिजीटल करण्यात आली आहे. नागरिक स्वतः मोबाईलद्वारे माहिती भरू शकतात. जनगणना कायदा 1948 नुसार नागरिकाची वैयक्तिक माहिती 100 टक्के गोपनीय राहील. ती कोणत्याही न्यायालयीन किंवा महसुली कामासाठी वापरली जात नाही. त्यामुळे प्रत्येकाने ही प्रक्रिया पूर्ण करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.अकोला जिल्ह्याने नेहमीच शासकीय उपक्रमात पुढाकार घेतला आहे. डिजिटल जनगणनेतही आपला जिल्हा महाराष्ट्रात अव्वल राहील, असा मला विश्वास आहे. ‘आपली नोंद, आपला विकास’ हे ब्रीद लक्षात ठेवून सर्व नागरिकांनी स्व-गणना करावी व प्रगणकांना सहकार्य करावे. जनजागृतीसाठी माध्यमांची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण असून, या कार्यासाठी माध्यमांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. जिल्हाधिकारी श्री. स्वामी यांनी जनगणना कार्यक्रमाचे टप्पे, मनुष्यबळ आदी माहिती दिली. महापालिका आयुक्त श्री. लहाने यांनीही शहरातील कार्यक्रम, मनुष्यबळ आदी माहिती दिली. श्री. मालठाणे यांनी आभार मानले.
स्वगणनेसाठी संकेतस्थळ : https://se.census.gov.in
—



