vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या तातडीने मार्गी लावाव्यात – राज्य सफाई कर्मचारी आयोग अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर

सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या तातडीने मार्गी लावाव्यात – राज्य सफाई कर्मचारी आयोग अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर

 

​अहिल्यानगर, प्रतिनिधी

जिल्ह्यातील सफाई कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती, पुनर्वसन, आरोग्य व सामाजिक सुरक्षेशी संबंधित सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावावेत. तसेच ‘हाताने मैला उचलण्यास प्रतिबंध व त्यांचे पुनर्वसन अधिनियम, २०१३’ ची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर यांनी दिले.

​जिल्हाधिकारी कार्यालयात सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार यांच्यासह सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी व सफाई कामगार प्रतिनिधी उपस्थित होते

​अध्यक्ष श्री. डागोर म्हणाले की, सफाई कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध योजना राबवत आहे, या योजनांची प्रभावी अंमलबजावणी प्रशासनाने करावी. सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षित व सन्मानजनक कामाचे वातावरण उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. त्यांच्या नियमित आरोग्य तपासणी, विमा संरक्षण, पाल्यांच्या शिक्षणासाठी सुविधा तसेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून पर्यायी रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात यावा.​लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार कामगारांच्या वारसांना त्वरित नियुक्त्या देण्यात याव्यात. तसेच सफाई कामगारांना किमान वेतन दरमहा विहित वेळेत मिळेल, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

​सफाई कामगार हे नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणारे ‘फ्रंटलाइन सैनिक’ आहेत. त्यामुळे संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करून त्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात. पुनर्वसन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून लाभार्थ्यांना शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी व लाभ मिळवून देण्यासाठी तालुकानिहाय विशेष मोहीम राबवावी, असेही त्यांनी सांगितले.

​डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेंतर्गत सफाई कामगारांना मोफत सदनिकेचा लाभ व मालकी हक्क मिळवून देण्यासह त्यांच्या हिताच्या बाबींवर अधिक भर देण्यात यावा. तसेच जिल्हास्तरावरील समितीत अनुभवी अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

​यावेळी अध्यक्ष श्री. डागोर यांनी उपस्थित सफाई कामगारांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

 

संबंधित पोस्ट

शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या नावे विज्ञान व नाविन्यता उपक्रम केंद्र सुरू करणार मंत्री ॲड. आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

संवाद मराठवाड्याशी” उपक्रमांतर्गत विभागीय आयुक्त दिलीप गावडे साधणार विभागातील गरजू शेतकऱ्यांशी ऑनलाइन वेबिनारद्वारे संवाद..

जागतिक महिला दिनानिमित्त बॅंक ऑफ महाराष्ट्र,ठाणे अंचल कार्यालयातर्फे महिला मेळावा संपन्नमेळाव्यामध्ये एकूण 52 बचतगटांना 2 कोटी 65 लाख रुपयांचे कर्जवाटप..

एन.डी.आर.एफ.ची पथक कराड येथे दाखल

युवकांनी काळानुरूप शिक्षण व कौशल्य संपादन करावे : सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत 1278 युवकांना रोजगार; नियुक्तीपत्र वितरण व 31 वाहनांचे लोकार्पण

१२ एप्रिल रोजी ठाण्यात पहिल्यांदाच ‘कोकणची लोकधारा’डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार गौरव