
बंगाल, आसाम व पदुचेरी विधानसभेत भाजपाचा विजय ,जालन्यात भाजपाचा फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष
जालना (प्रतिनिधी) : पश्चिम बंगाल, आसाम व पदुचेरी विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या दणदणीत विजयाच्या पार्श्वभूमीवर जालना शहरात आज विजय जल्लोष साजरा करण्यात आला. जालना शहरातील वीर सावरकर चौक येथे आयोजित या कार्यक्रमाला माजी मंत्री आ.बबनरावजी लोणीकर, माजी आमदार कैलासजी गोरंटयाल, भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे, उपमहापौर राजेश राऊत, बद्रीनाथ पठाडे, युवानेते अक्षय गोरंटयाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात फटाक्यांची आतषबाजी करून करण्यात आली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. “भारत माता की जय”, “वंदे मातरम्” आणि “भाजपा जिंदाबाद” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. हा विजय पंतप्रधानांच्या नेतृत्वावर व केंद्र सरकारच्या विकासाभिमुख धोरणांवर जनतेने दाखविलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे.



