जालना, प्रतिनिधी जिल्ह्यातील पुतळे आणि स्मारकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज ‘पुतळा समिती’ची आढावा बैठक पार पडली. यावेळी बैठकीस जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल तसेच विविध संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बैठकीत मुख्यत्वे जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक पुतळ्यांच्या परिसरातील कायदा, सुव्यवस्था आणि सुरक्षिततेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संवेदनशील ठिकाणांवर विशेष पोलीस गस्त ठेवण्याबाबत तसेच सीसीटीव्ही (CCTV) यंत्रणा प्रभावीपणे कार्यान्वित करण्याबाबत पोलीस अधीक्षकांशी चर्चा झाली.
जिल्हाधिकारी यांनी महापुरुष आणि क्रांतीकारकांच्या पुतळ्यांच्या परिसराची नियमित स्वच्छता, रंगरंगोटी व योग्य देखभाल राखण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना तातडीने आवश्यक सूचना देण्याचे निर्देश दिले. याशिवाय, कोणत्याही ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून किंवा विनापरवाना पुतळे उभारले जाणार नाहीत, याची दक्षता प्रशासनाने घेण्याचे आदेशही जिल्हाधिकारी यांनी दिले.
बैठकीत प्रशासनाने पुतळ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करत असल्याचे स्पष्ट केले असून, नागरिकांनी देखील या नियमांचे पालन करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.