vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

विज्ञान आणि अध्यात्माच्या संगमातून कर्करोगावर मात करण्याचा संकल्प   – राज्यपाल जिष्णू देव वर्माखारघर येथील इस्कॉन मंदिरात ‘होलिस्टिक कॅन्सर हीलिंग रिट्रीट’चा शुभारंभ .

विज्ञान आणि अध्यात्माच्या संगमातून कर्करोगावर मात करण्याचा संकल्प   – राज्यपाल जिष्णू देव वर्माखारघर येथील इस्कॉन मंदिरात ‘होलिस्टिक कॅन्सर हीलिंग रिट्रीट’चा शुभारंभ .

नवी मुंबई, प्रतिनिधी : विज्ञान मानवी शरीराला बरे करण्याचे कार्य करते, तर अध्यात्म मन, आत्मा आणि जगण्याची इच्छाशक्ती बळकट करण्याचे सामर्थ्य प्रदान करते. विज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वय साधला गेल्यास जीवनाकडे पाहण्याचा अधिक समग्र (होलिस्टिक) दृष्टिकोन विकसित होतो, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले.

खारघर येथील इस्कॉन (ISKCON) मंदिरात आयोजित ‘होलिस्टिक कॅन्सर हीलिंग रिट्रीट’ (HCHR) या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी इस्कॉन नवी मुंबईचे मंदिराध्यक्ष डॉ. सूर दास, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड, भक्तिवेदांत कॉलेजचे संचालक डॉ. व्ही. सेवक दास, कॅल्विन सेउंगवॉन यी, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, डॉ. विक्रम गोटा, डॉ. अमित जोशी, डॉ. रजनीश कामत, डॉ. अविनाश टिप्पणी यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील संशोधक, तज्ज्ञ डॉक्टर, कर्करोग रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यपाल श्री. वर्मा म्हणाले की, खारघर येथील इस्कॉन मंदिर हे केवळ दगड, सिमेंट आणि वाळूने उभारलेले बांधकाम नसून ते श्रद्धा, भक्ती आणि लाखो लोकांच्या प्रार्थनांचे प्रतीक आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला होता. स्वामी विवेकानंदांप्रमाणेच ‘भगवद्गीते’चा वैश्विक संदेश जगभर पोहोचविणाऱ्या इस्कॉनचे संस्थापक-आचार्य परमपूज्य ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या कार्याचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.

भगवद्गीतेतील ‘आत्मा अमर आहे’ हा संदेश दुःख, संकट आणि निराशेच्या काळात मानवाला धैर्य, आशा आणि मानसिक बळ प्रदान करतो, असे सांगून राज्यपालांनी अध्यात्माच्या महत्त्वावर प्रकाश टाकला.

कर्करोग हे आज मानवजातीसमोरील एक गंभीर आरोग्य आव्हान असून जगभरात दरवर्षी सुमारे २ कोटी, तर भारतात १४ लाखांहून अधिक नवीन कर्करोग रुग्णांची नोंद होत असल्याचे त्यांनी सांगितले. आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे उपचारपद्धतीत मोठी प्रगती झाली असली, तरी कर्करोगाचा परिणाम रुग्णांच्या मानसिक, भावनिक आणि कौटुंबिक आयुष्यावरही होत असतो. ‘होलिस्टिक कॅन्सर हीलिंग रिट्रीट’ हा उपक्रम या सर्व पैलूंचा विचार करून रुग्णांना सर्वांगीण आधार देणारा ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

हा उपक्रम भारताच्या समृद्ध ‘आयुष’ परंपरेवर आधारित असून त्यामध्ये आयुर्वेद, योग, ध्यान आणि वैदिक तत्त्वज्ञानाचा समावेश आहे. टाटा मेमोरियल सेंटरच्या ‘ॲक्टरेक’ (ACTREC) येथील आयुष केंद्राच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेला हा कार्यक्रम कर्करोग रुग्ण, कर्करोगमुक्त झालेले रुग्ण (सर्व्हायव्हर्स) तसेच त्यांच्या नातेवाईकांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

देशभरातून मोठ्या संख्येने कर्करोग रुग्ण उपचारासाठी मुंबई आणि नवी मुंबई येथे येतात. अशा रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी कर्करोग रुग्णालयांच्या परिसरात सुसज्ज व परवडणाऱ्या निवास सुविधांची निर्मिती करणे आवश्यक असल्याचे सांगून, यासाठी कॉर्पोरेट क्षेत्राने तसेच इस्कॉनसारख्या सामाजिक व आध्यात्मिक संस्थांनी पुढाकार घेऊन सहकार्य करावे, असे आवाहनही राज्यपालांनी यावेळी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक इस्कॉन नवी मुंबईचे मंदिर अध्यक्ष डॉ. सूर दास यांनी केले.

00000

संबंधित पोस्ट

महिला शेतकरी गटांना कृषी अवजारे बँक स्थापनेसाठी अर्ज करण्यास 25 एप्रिलपर्यत मुदतवाढ

राज्यातील सार्वजनिक विद्यापीठातील अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता – मंत्री चंद्रकांत पाटील

जिल्ह्यातील नागरिकांनी ‘स्व-गणना’ करावी; जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी

vishwatmaklokswamivarta

नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर

vishwatmaklokswamivarta

बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात MY Bharat पोर्टल नोंदणी अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद…