वृक्षारोपण,वृक्षसंवर्धन करणे काळाची गरज- प्रमुखजिल्हा व सत्रन्यायाधीश एन.के.ब्रह्मे..
सांगली, प्रतिनिधी : ग्लोबल वॉर्मिंगमुळे वृक्षारोपण करणे व वृक्षसंवर्धन करणे ही काळाची गरज असून त्यामुळे पुढील येणारी पिढी ही चांगल्या वातावरणामध्ये व पर्यावरणामध्ये राहू शकेल, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. ब्रह्मे यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली, वकील संघटना, जिल्हा व सत्र न्यायालय सांगली, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सांगली यांच्या वतीने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आवारात वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. या प्रसंगी जिल्हा न्यायाधीश क्र. २ एस. आर. पडवळ, तदर्थ जिल्हा न्यायाधीश क्र. २ एम. एस. काकडे, मुख्य न्यायदंडाधिकारी एस. एन. शेट्टी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे, इतर न्यायिक अधिकारी तसेच सांगली वकील संघटनेचे अध्यक्ष अशोक वाघमोडे, वकील संघटनेचे पदाधिकारी, निसर्गरम्य फौंडेशनचे अध्यक्ष कुलदीप देवकुळे व पदाधिकारी, शिवराज काटकर, अविनाश कोळी, भारत कांबळे, अॅड. दीपक कांबळे तसेच प्रबंधक श्रीमती बी. डी. कासार व जिल्हा न्यायालय सांगली येथील कर्मचारी उपस्थित होते.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. ब्रह्मे म्हणाले, प्रदूषणामुळे मानवास उपयुक्त असलेल्या ओझोन वायूची होत असलेली घट, वनाची होत असलेली हानी तसेच प्लास्टिकच्या वापराबाबत चिंता व्यक्त करून यावर उपाय म्हणून प्रत्येक नागरिकाने किमान एका वृक्षाची लागवड करून संवर्धन करावे, प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळावा व प्रदूषणास आळा घालून मानवी जीवन सुखमय करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रास्ताविकात सरकारी वकील ॲड. व्ही. एम. देशपांडे पर्यावरणाचे महत्व सांगितले. कार्यकमाचे नियोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक शंकरराव वानखडे, संतोष खंदारे, नितीन आंबेकर व इतर कर्मचारी यांनी पार पाडले.