महिला सुरक्षा व न्यायासाठी महिला काँग्रेसचा जालना शहरात मूक मोर्चा गांधी चमनवर निषेधाची शांत आंदोलनात्मक भूमिका..
जालना (प्रतिनिधी) : देशभरात महिलांवर वाढणारे अत्याचार, न्याय मिळण्यात येणारा विलंब आणि केंद्र सरकारची निष्क्रिय भूमिका याच्या निषेधार्थ जालना जिल्हा महिला काँग्रेसतर्फे गांधी चमनवर शनिवारी मूक मोर्चा काढण्यात आला.
महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, केंद्र सरकार या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करत आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर सरकार मौन बाळगत आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अल्का लांबा यांच्या निर्देशानुसार आणि महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या आदेशानुसार राज्यभर विविध ठिकाणी महिला काँग्रेसतर्फे आंदोलने करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जालना शहरात गांधी चमनवर हा मूक मोर्चा काढण्यात आला.
मूकतेतून संतप्त संदेश,या मूक मोर्चाद्वारे महिलांनी “आमच्यावर होणाऱ्या अन्यायाचा आवाज ऐका” असा संदेश सरकारला दिला. कोणताही गोंधळ किंवा घोषणाबाजी न करता शांततेत व्यक्त केलेला निषेध हे आंदोलनाचे वैशिष्ट्य ठरले. या मूक आंदोलनात जिल्हाध्यक्षा नंदाताई पवार यांच्यासह लतीफा शेख, सविता गायकवाड, जया आठवले, सावित्रीबाई इंगळे, मनीषा चांदोडे, प्रतिक्षा खाडे, कोमल कामतीकर आणि इतर महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
न्यायासाठी लढा सुरूच राहणार : नंदाताई पवार”महिलांवर अत्याचार रोखण्याची जबाबदारी सरकारची आहे. मात्र सत्ताधारी मंडळी केवळ निवडणुकीपुरते महिला हिताचे घोषणाबाजीत अडकून राहतात. आमचा लढा केवळ राजकारणासाठी नव्हे, तर प्रत्येक अत्याचारग्रस्त महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी आहे,” असे जिल्हाध्यक्षा नंदाताई पवार यांनी स्पष्ट केले.