सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धेसाठी अर्ज करावेत- जिल्हाधिकारी संतोष पाटील
सातारा, प्रतिनिधी: गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला आहे. इच्छुक गणेशमंडळांनी गणेश चतुर्दशीच्या निर्धारित मुदतीत mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
यासाठी तालुकास्तरावर प्रथम पारितोषिक 25 हजार, जिल्हास्तरावर 50 हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक, 40 हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक, 30 हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक, राज्यस्तरावर 7 लाख 50 हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक, 5 लाख रुपयांचे द्वितीय पारितोषिक, 2 लाख 50 हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक व उर्वरित 33 जिल्हा विजेते प्रत्येकी 50 हजार मानधन व प्रमाणपत्र अशी एकूण 1 कोटी 50 लाख रुपयाचे पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी निकष पूढीलप्रमाणे आहेत. कला व सांस्कृतिक कार्यक्रम-20 गुण, संस्कृतीचे जतन-संर्वधन, निसर्ग व सार्वजनिक संपत्ती जतन-20 गुण, सामाजिक उपक्रम 20 ते 25 गुण, पर्यावरणपुरक आयोजन व नवोपक्रम-20 गुण, महिला प्रतिनिधीत्व किमान 30 टक्के असणे अपेक्षित आहे. हा मागील वर्षीच्या अनंत चतुर्दशीपासून ते चालू वर्षीच्या अनंत चतुर्दशीपर्यंत केलेले कार्य असा मुल्य मापनाचा कालावधी असेल.
गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्याकरिता स्पर्धा आयोजन करून अभिप्रायासह गुणांकन करून प्रस्ताव शासनास सादर करण्यासाठी तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय व राज्यस्तरावरील समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती मंडळाच्या उत्सवस्थळी प्रत्यक्ष भेट देणार आहे. समितीकडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणांकन करून गणेशोत्सव मंडळाची शिफारस करून त्यांची नावे सर्व कागदपत्र व्हीडिओसह राज्य समितीकडे देतील. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत, संचालक, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्याकडे सादर करतील.
निकालासंदर्भात स्वतंत्र सूचना देण्यात येतील. जास्तीत जास्त मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री.पाटील यांनी केले आहे.