vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत नागरिकांना वेळेत सेवा द्या – आयुक्त डॉ. किरण जाधव-सर्व विभागांनी सेवा ऑनलाईन करण्यावर भर द्यावा

लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत नागरिकांना वेळेत सेवा द्या – आयुक्त डॉ. किरण जाधव-सर्व विभागांनी सेवा ऑनलाईन करण्यावर भर द्यावा

नांदेड, प्रतिनिधी :- नागरिकांना शासनाच्या विविध सेवा व योजनांचा लाभ विहित कालावधीत मिळावा यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम लागू करण्यात आला आहे. या अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणी द्वारे नागरिकांना वेळेवर सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश छत्रपती संभाजीनगर येथील राज्य लोकसेवा हक्क आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी दिले.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम-2015 अंतर्गत अधिसूचित सेवांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप मोळोदे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी अजय शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) श्री. गिरी तसेच सर्व उपविभागीय अधिकारी व विभागप्रमुख उपस्थित होते.

आयुक्त डॉ. किरण जाधव म्हणाले, लोकसेवकांनी मानसिकता बदलून नागरिकांना घरबसल्या सर्व सेवा ऑनलाईन उपलब्ध करून द्याव्यात. विकसित भारत 2047 या उद्दिष्टाकडे वाटचाल करताना सर्वांनी कार्यक्षमतेने काम करण्याची गरज आहे. जिल्ह्याच्या मूल्यमापनातील क्रमवारी उंचावण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी जबाबदारीने पुढाकार घ्यावा. नागरिकांना सेवा देताना उत्कृष्ट प्रशासक म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाची लोकप्रशासन संस्कृती अंगिकारावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्याच्या व भावी पिढीच्या हितासाठी अधिकाधिक सेवा ऑनलाईन करण्यावर भर द्यावा, असे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत सादरीकरणाद्वारे सविस्तर मार्गदर्शन केले. प्रथम व द्वितीय अपीलीय अधिकाऱ्यांचे अधिकार व जबाबदाऱ्या तसेच विहित वेळेत काम पूर्ण न केल्यास लागू होणाऱ्या दंडात्मक तरतुदींची माहितीही त्यांनी दिली.

नांदेड जिल्ह्याची कामगिरी आगामी वर्षात अधिक उत्कृष्ट होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. चालू आर्थिक वर्षअखेर ३१ मार्चपर्यंत सर्व विभागांनी उद्दिष्टपूर्ती साध्य करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या ऑनलाईन सेवांपैकी ‘ई-टपालवाला’ ही सेवा उल्लेखनीय असून ती सर्व कार्यालयांत प्रभावीपणे राबवावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद व महानगरपालिका प्रशासनाने अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत केलेल्या कार्यवाहीचे सादरीकरण केले.

प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी अजय शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. श्री. कर्डिले यांनी मागील वर्षभरात जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या उपक्रमांची माहिती देत ३१ मार्चपर्यंत सर्व कामे प्रगतीपथावर पूर्ण करण्यात येतील, असा विश्वास व्यक्त केला.बैठकीस विविध विभागांचे विभागप्रमुख तसेच प्रथम व द्वितीय अपीलीय अधिकारी उपस्थित होते.

००००००

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रात कोरोना वाढता प्रभाव, एका दिवसात 65 नवे रुग्ण, मुंबईत 22 संक्रमित, पुन्हा लॉकडाऊन ?आरोग्य विभाग नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे, मास्क घालण्याचे आणि गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळण्याचे आवाहन

बुलडाणा जिल्हयातील संग्रामपूर , जळगांव तालुक्याला अवकाळी वादळी पावसाचा फटका…केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले जिल्हा प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश..

माथाडी मंडळ आस्थापनेवरील पदभरतीकरिता उमेदवारांना परीक्षा शुल्क भरण्यास मुदतवाढ

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या मंत्रालय/वर्ल्ड ट्रेड सेंटर मार्गे अटल सेतू MTHL या मार्गावरील मार्ग क्र.116 व 117 या मार्गांवर ‘महिला विशेष’ बससेवा सुरु

नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान : लाखो नागरिकांना मिळणार नवदृष्टीचा लाभ

vishwatmaklokswamivarta

नद्या या भारतीय संस्कृतीच्या साक्षीदार – माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद “एक भारत, श्रेष्ठ भारत” संकल्पना अधिक दृढ करावी