दक्षिण भारतात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता- हवामान खात्याचा अंदाज
राज्य प्रतिनिधी-भारतीय हवामान विभागाने दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये पुढील दोन दिवसांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. प्रामुख्याने तामिळनाडू, केरळ आणि केंद्रशासित प्रदेश असणाऱ्या पुद्दुचेरीमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, द्वीपकल्पीय भारतात पावसाचा जोर वाढणार आहे. दक्षिण तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कारैकालमधील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. केरळ राज्यासह माहे परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. या काळात ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. कर्नाटकातही काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाचे सावट असेल. हिंदी महासागर आणि लगतच्या बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे बाष्पयुक्त वारे दक्षिणेकडील राज्यांकडे वळले आहेत. याव्यतिरिक्त, कोमोरीन आणि मन्नारच्या आखाताजवळ चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्याने समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे. या काळात मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिणेत पाऊस पडत असतानाच, उत्तर आणि वायव्य भारतात तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. पुढील सात दिवसांत या भागांतील कमाल तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसने वाढ होईल, असा अंदाज आहे. तसेच, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये येत्या दोन-तीन दिवसांत हलका पाऊस किंवा हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दक्षिण भारतातील या पावसाळी स्थितीमुळे मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहू शकते. काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्यास आश्चर्य वाटायला नको, ज्यामुळे रब्बी पिकांवर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. समुद्र खवळलेला असल्याने मन्नारचे आखात आणि केरळ किनारपट्टीवर पर्यटकांनी जाणे टाळावे. मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतूक आणि विमान वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो, तरी प्रवाशांनी प्रवासापूर्वी हवामानाचा आढावा घ्यावा. वीज पडण्याची शक्यता असल्याने झाडाखाली आश्रय घेऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत