
नववर्ष प्रण-सुरक्षित अन्न’ मोहिमेचा समारोप;दर्जेदार रेस्टॉरंट्सचा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरव
जालना, प्रतिनिधी:- अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या संकल्पनेतून आणि आयुक्त श्रीधर डुबे-पाटील यांच्या निर्देशानुसार दि. 24 डिसेंबर ते 10 जानेवारी 2026 या कालावधीत ही विशेष मोहीम राबविण्यात आली होती. नूतन वर्षाच्या स्वागतानिमित्त हॉटेलिंगसाठी बाहेर पडणाऱ्या खवय्यांना सुरक्षित आणि स्वच्छ अन्न मिळावे, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या ‘नववर्ष प्रण-सुरक्षित अन्न’ मोहिमेचा समारोप झाला. या मोहिमेत स्वच्छतेचे निकष पाळणाऱ्या जालना शहरातील पहिल्या तीन रेस्टॉरंट्सना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
प्रशासनाने शहरातील लहान, मध्यम आणि मोठ्या अशा सर्वच स्तरातील रेस्टॉरंट्सची कसून तपासणी केली. यामध्ये केवळ अन्नाचा दर्जाच नाही तर किचनची अंतर्गत रचना आणि कार्यपद्धती, कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता आणि त्यांचे प्रशिक्षण, अभिलेख जतन करण्याची पद्धती, हॉटेलची देखभाल आणि दुरुस्ती आदि तांत्रिक बाबींचीही पडताळणी करण्यात आली. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील इतर हॉटेल व्यावसायिकांनाही आपले मानांकन सुधारण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.
अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 च्या निकषांची चोख अंमलबजावणी करणाऱ्या जिल्ह्यातील तीन आस्थापनांनी बाजी मारली आहे. यामध्ये प्रथम क्रमांक सिद्धार्थ सेठी यांचे मे. सिद्धार्थ द फर्न, द्वितीय क्रमांक वरद मोहता यांचे मे. रसोई प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि तृतीय क्रमांक विनीत साहनी यांचे मे. हॉटेल विजय विलास यांनी पटकाविला आहे. या सोहळ्याचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन अन्न सुरक्षा अधिकारी अश्विनी तांबे यांनी केले. तर यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त निखिल कुलकर्णी आणि अन्न सुरक्षा अधिकारी अनुजा नगरारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
-*-*-*-*-



