*मार्चअखेर सुट्ट्यांच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार;* *खरेदी-विक्री व्यवहारांसाठी मोठा दिलासा*
रायगड-अलिबाग, प्रतिनिधी- आर्थिक वर्षाचा शेवट आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर होणारी मालमत्ता खरेदी-विक्रीची गर्दी लक्षात घेता, राज्य सरकारने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मार्च महिन्यातील चार सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही राज्यातील सर्व दुय्यम निबंधक आणि सह जिल्हा निबंधक कार्यालये पूर्णवेळ सुरू ठेवण्याचे आदेश नोंदणी महानिरीक्षक श्री रवींद्र बिनवडे यांनी दिले आहेत.
शासकीय परिपत्रकानुसार, सुट्ट्यांच्या २६ मार्च २०२६, २८ मार्च २०२६, २९ मार्च २०२६, ३१ मार्च २०२६ (आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस) दिवशी दस्त नोंदणीची कामे सुरू राहतील. मार्चअखेर असल्याने अनेक नागरिक आपले प्रलंबित खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात, नवीन वर्षाच्या मुहूर्तावर मालमत्ता खरेदी करण्याकडे लोकांचा कल मोठा असतो, त्यामुळे दस्त नोंदणीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. तसेच मुद्रांक शुल्काचे (Stamp Duty) उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालये देखील या सुट्ट्यांच्या दिवशी कार्यरत राहणार आहेत. ज्या कार्यालयांची साप्ताहिक सुट्टी शनिवार-रविवार सोडून इतर दिवशी आहे, त्या कार्यालयांनी त्यांच्या दोन सुट्ट्यांपैकी एक दिवस कार्यालय सुरू ठेवायचे आहे.
या निर्णयामुळे मालमत्ता खरेदी करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, मार्चअखेर होणारी धावपळ कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास रायगड-अलिबाग सह जिल्हा निबंधक अमित शेडगे यांनी व्यक्त केला आहे.