अमरावती, प्रतिनिधी : बकरी ईदच्या दिवशी गोवंशाचा बळी देऊ नये, यासाठी पशूसंवर्धन विभागाने प्राण्यांचे टॅगींग करावे, यासाठी महापालिकास्तरावर टॅगींग करण्यासंदर्भात जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात प्राणीक्लेश समितीची बैठक पार पडली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक निकेतन कदम, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, पशूसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय कावरे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी गोवंशाच्या कत्तलीवर बंदी आहे. जिल्ह्यात कत्तलखाना नसल्याने अवैध कत्तलीचा प्रकार होऊ नये, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासोबतच नियमानुसार गोवंशाचे मांस बाळगणे आणि इतर राज्यातून मांसाची वाहतूक करणे गुन्हा आहे. गोवंशाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी शहरात 8 ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले आहे. गोवंश वाहतुकीसाठी नियम आहेत. त्यामुळे नियमानुसार वाहतूक होत नसल्यास प्राण्यांवरील क्रूरता या कलमाखाली गुन्हा नोंदविण्यात येणार आहे. गोवशांची कत्तल रोखण्यासह गोवंशाचे लसीकरण, आहार योजना परिणामकारकरित्या राबविणे आवश्यक आहे.
महापालिका क्षेत्रात विना टॅगींगची जनावरे टॅगींग करण्यासाठी जनजागृती करावी. त्यानंतर टॅगींग झालेली नाहीत, अशी जनावरे गोरक्षण संस्थांमध्ये पाठविण्यात यावी. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कत्तलीचे प्रकार रोखण्यासाठी जनावरांच्या अवैध वाहतुकीवर कारवाई करण्यात यावी. न्यायालयात प्रकरण सुरू असताना जप्त केलेले वाहन सोडण्यात येऊ नये, यासाठी न्यायालयात अर्ज सादर करावा. पोलिस आणि परिवहन विभागाने याबाबत कारवाई केल्यास अवैध वाहतूक करणाऱ्यांना धाक निर्माण होण्यास मदत होणार असल्याने परिणामकारक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.