
महापौर श्रीम सुजाता पाटील यांनी विविध ठिकाणी भेटी देत केली पावसाळी स्थितीची प्रत्यक्ष पाहणी…
नवी मुंबई प्रतिनिधी- मागील तीन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसाच्या अनुषंगाने नवी मुंबईच्या महापौर श्रीमती सुजाता पाटील यांनी बेलापूरपासून दिघ्यापर्यंत महापालिका क्षेत्रात विविध विभागांतील सखल भागात पाणी साचण्याच्या ठिकाणी भेटी देऊन तेथील स्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. याप्रसंगी शहर अभियंता श्री आरदवाड, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ अजय गडदे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
दुपारी 1.15 वा. सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार नेरूळ एल पी उड्डाणपुलाखाली पावसाचे पाणी साठलेले होते. त्या ठिकाणी शुभांगी बलखंडे, वय वर्ष 17, गांधीनगर, नेरूळ एमआयडीसी तसेच उज्वला वाघ, वय वर्ष 19, शिरवणे गाव, सेक्टर 1, नेरूळ या दोन मुलींना विजेचा झटका लागला आहे. त्या दोन मुलींना डी वाय पाटील रुग्णालय नेरूळ या ठिकाणी उपचारार्थ नेण्यात आले होते. त्यांची प्रकृती स्थिर असून आता त्या महानगरपालिकेमार्फत फोर्टिस रुग्णालय, वाशी येथे वैद्यकीय निगराणीखाली उपचार घेत आहेत. महापौर श्रीम. सुजाता पाटील यांनी या दोन्ही मुलींची व त्यांच्या कुटुंबीयांची लगेचच भेट घेत त्यांना धीर दिला आणि विजेचा शॉक नेमका कोणत्या विद्युत तारेच्या संपर्कात पाणी आल्यामुळे लागला याची तत्परतेने तपासणी करण्याचे निर्देश दिले.
आज दुपारी भरतीच्या वेळी मुसळधार पाऊस सुरू असल्याने महानगरपालिका क्षेत्रातील काही सखल भागात पावसाचे पाणी साचल्याचे निदर्शनास आले. त्या ठिकाणी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांमार्फत तातडीने मनुष्यबळ उपलब्ध करून देऊन मदतकार्य व्यवस्था करण्यात आली होती तसेच पाणी उपसा पंपांचीही व्यवस्था करण्यात आली होती.
अशा भरतीच्या काळात पाणी साचलेल्या सखल भागातील बेलापूर ते दिघा येथील विविध ठिकाणांना भेटी देत महापौर श्रीम. सुजाता पाटील यांनी तेथील स्थितीची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व अशा ठिकाणी पाणी उपसा पंपांची संख्या वाढवून नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी अधिकारी, कर्मचारी दक्षतेने कार्यरत राहतील असे नागरिकांना आश्वस्त केले.
ज्या ठिकाणी रस्त्यावर पाणी साचते त्या ठिकाणांवर तातडीने रस्त्याच्या कडेचे चर खोदून व वॉटर एन्ट्री मोकळ्या करून पाणी वाहते करण्याची व्यवस्था करावी असे निर्देशित करण्यात आले. त्याचप्रमाणे नाल्यांमध्ये प्लास्टिक व इतर कचरा अडकून ते तुंबू नयेत या दृष्टीनेही दक्षता घेण्याची व अडकलेला कचरा नियमित साफ करण्याची सूचना करण्यात आली.



