महापौर सुजाता पाटील यांनी विशेष बैठकीत घेतला पावसाळी स्थितीचा सविस्तर आढावा
नवी मुंबई प्रतिनिधी मागील तीन दिवस सतत सुरू असलेल्या पावसामुळे नवी मुंबईतील काही भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्याचे निदर्शनास आले असून याचा त्रास नागरिकांना मोठ्या प्रमाणात झाला हे लक्षात घेत सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी यापुढील पावसाळा कालावधीत अधिक गांभीर्यपूर्वक सतर्कतेने काम करावे असे निर्देश महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी पावसाळी परिस्थितीच्या विशेष आढावा बैठकीप्रसंगी दिले. काल 1 जुलै रोजी भर पावसात बेलापूरपासून दिघ्यापर्यंत संपूर्ण महापालिका क्षेत्रातील स्थितीची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर आज महापौर महोदयांनी विशेष बैठक बोलावत यापुढील कालावधीत प्रत्येक पाणी साचण्याच्या संभाव्य ठिकाणी आपली यंत्रणा नागरिकांना त्रास होऊ नये याकरिता सतर्क राहिली पाहिजे असे निर्देशित केले.
याप्रसंगी उपमहापौर श्री.दशरथ भगत, आयुक्त डॉ.कैलास शिंदे, आरोग्य समिती सभापती डॉ.जयाजी नाथ, नगरसेवक श्री. रविंद्र इथापे व श्रीम.शुभांगी पाटील, अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड तसेच इतर विभागप्रमुख, विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
नवी मुंबई शहर समुद्रसपाटीपासून खालच्या पातळीवर वसलेले असल्याने भरतीच्या काळात अतिवृष्टी झाल्यास शहरातील काही अतिसखल भागात पाणी साचते. मात्र याठिकाणी महानगरपालिकेची यंत्रणा अधिक सक्षमतेने नागरिकांच्या मदतीसाठी कार्यरत असली पाहीजे असेही निर्देश संबंधित विभाग अधिकारी आणि कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले.
विशेषत्वाने पाणी साचल्याचे आढळले अशा ठिकाणी रस्त्यावरून पाणी गटारात वाहून नेणा-या वॉटरएन्ट्रीज युध्द पातळीवर तातडीने खुल्या कराव्यात व त्यासोबतच पाऊस पडत असताना त्यामध्ये कचरा अडकून त्या बंद होऊन पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले.
काल एलपी सिग्नलजवळ पाण्यात उघड्या असलेल्या विद्युत तारेमुळे झटका लागून 2 मुली जखमी झाल्याची दुर्घटना लक्षात घेत संबंधित प्रकरणात दोषी असलेल्यांवर प्रशासकीय कारवाई करावी असे महापौर महोदयांनी सूचित केले तसेच अशी घटना पुन्हा घडू नये याकरिता महानगरपालिकेच्या विद्युत विभागाने एमएसईडीसीएलच्या अधिका-यांसमवेत संपूर्ण पाहणी करावी व आवश्यक त्या ठिकाणी तातडीने दुरूस्ती करून घ्यावी असेही निर्देशित करण्यात आले.
काल रूग्णालयात घडलेल्या गरोदर महिलेच्या दुर्दैवी मृत्यूच्या अनुषंगाने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. त्या अहवालात दोषी आढळणा-यांविरोधात कारवाई करावीच मात्र तोपर्यंत या प्रकरणी प्रथमदर्शनी निष्काळजीपणा करणा-या संबंधितांवरही कारवाई करण्याचे निर्देश महापौर महोदयांनी दिले. सर्व शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल त्वरित सादर करण्यात यावा तसेच सर्व शाळांच्या आवारातील झाडांची त्वरित छाटणी करून घ्यावी असेही निर्देश देण्यात आले.
नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेणे व त्यादृष्टीने मदत कार्यासाठी तत्पर राहणे ही आपली जबाबदारी असून संबंधित अधिका-यांवर आपापल्या कामाची जबाबदारी निश्चित करण्यात येत आहे असे महापौर महोदयांनी स्पष्ट केले. सर्व कोचींग क्लासेस व ट्युशन्सच्या जागांची स्ट्रक्चरलदृष्ट्या पाहणी करावी तसेच अग्निसुरक्षेच्या दृष्टीनेही पाहणी करावी असे निर्देश आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी याप्रसंगी दिले.
आपल्या दुर्लक्षामुळे कोणतीही दुर्घटना घडणार नाही याची नमुंमपा कर्मचा-यांनी काळजी घेतानाच नागरिकांच्या संपर्कात राहून त्यांच्या अडचणीच्या काळात मदत करण्यासाठी प्रत्येकाने तत्पर रहावे असे सांगतानाच महापौर श्रीम. सुजाता पाटील यांनी कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी नागरिकांनी 1800222309 / 1800222310 या टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.