‘विचारवेध’मध्ये 3 जुलै रोजी ऐरोलीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकात श्री.अविनाश धर्माधिकारी करणार राजर्षी शाहू महाराजांना वैचारिक अभिवादन
नवी मुंबई प्रतिनिधी- सेक्टर 15 ऐरोली येथील नवी मुंबई महानगरपालिकेचे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे ‘ज्ञानस्मारक’ म्हणून नावाजले जात आहे. याठिकाणी असलेले समृध्द ग्रंथालय आणि अत्याधुनिक इ – लायब्ररी वाचक व अभ्यासकांसाठी अत्यंत महत्वाचे असे दालन आहे. याठिकाणी आयोजित केल्या जाणा-या ‘विचारवेध’ या व्याख्यान शृंखलेमध्ये अनेक मान्यवर विचारवंत, साहित्यिक, व्याख्याते यांनी आपल्या व्याख्यानांमधून वैचारिक जागर केला आहे.
याच व्याख्यान मांदियाळीत 26 जून रोजी झालेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून शुक्रवार दि. 3 जुलै 2026 रोजी, सायं. 6.30 वा., लेखक, शिक्षणतज्ज्ञ, युवा मार्गदर्शक आणि चाणक्य मंडल परिवाराचे संस्थापक व मार्गदर्शक, माजी सनदी अधिकारी श्री.अविनाश धर्माधिकारी हे ‘शिक्षण हेच परिवर्तनाचं साधन – शाहू महाराजांचा संदेश’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत.
श्री.अविनाश धर्माधिकारी यांचा प्रशासकीय सेवेतील गाढा अनुभव आणि चाणक्य मंडल परिवाराच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक अधिकारी यामुळे त्यांचे प्रेरणादायी विचार ऐकणे ही सर्वांसाठीच व त्यातही प्राधान्याने युवकांसाठी एक मोठी पर्वणी आहे. त्यामुळे उद्या 3 जुलै रोजी, सायं. 6.30 वा., ऐरोली सेक्टर 15 येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे ज्येष्ठ विचारवंत श्री.अविनाश धर्माधिकारी यांना ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.