
सनातनच्या वतीने देशभरात ८१ ठिकाणी; तर मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात ९ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ संपन्न !
आगामी भीषण आपत्काळातून तारण्यासाठी व ‘रामराज्या’साठी साधनेला पर्याय नाही !
– सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमा महोत्सवात ‘रामराज्य’ स्थापनेचा जागर
मुंबई प्रतिनिधी- ‘‘संपूर्ण जगावर घोंघावणारे तिसर्या विश्वयुद्धाचे संकट, वाढती महागाई, बेरोजगारी आणि जीवघेण्या स्पर्धेमुळे समाजाला ग्रासलेले नैराश्य, अशा अत्यंत भीषण आणि अस्थिर परिस्थितीतून समाजाला तारण्यासाठी आता केवळ भौतिक उपाययोजना पुरेशा नाहीत. आज दिशाहीन झालेल्या समाजाला पुन्हा एकदा प्रभू श्रीरामांच्या आदर्शांवर आधारित ‘रामराज्याची’ नितांत आवश्यकता आहे. मात्र, हे रामराज्य केवळ राजकीय किंवा भौतिक प्रयत्नांतून साकार होणार नाही, तर त्यासाठी समाजाला ‘साधनेचे’ आणि ‘गुरुचरणांचे’ भक्कम आध्यात्मिक अधिष्ठान असणे अनिवार्य आहे. जेव्हा समाजाची आध्यात्मिक श्रद्धा प्रत्यक्ष सुशासनात परिवर्तीत होते, तेव्हाच खऱ्या अर्थाने रामराज्याची पहाट होते,’’ असे ओजस्वी प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी केले. सनातन संस्थेच्या वतीने सी.के.पी. हॉल, ठाणे (प.) येथे अत्यंत भावपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या ‘गुरुपौर्णिमा महोत्सवात’ ते बोलत होते. यंदा संस्थेच्या वतीने मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, इंग्रजी, तेलुगु, मल्याळम् आदी विविध भाषांमध्ये देशभरात ८१ ठिकाणी, तर जिल्ह्यात मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात ९ ठिकाणी हा महोत्सव संपन्न झाला. माटुंगा, विलेपार्ले, भांडुप, ठाणे, डोंबिवली, कल्याण, कोपरखैरणे आणि पनवेल या ठिकाणी हे कार्यक्रम झाले. आगामी जागतिक युद्धाचे आणि आपत्काळाचे सावट पहाता, हिंदूंनी प्रथमोपचार, अग्नीशमन आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले.
गुरूंचे आज्ञापालन करणे हीच गुरुभक्ती आहे ! – ह.भ.प.डॉ.मदन महाराज गोसावी
गुरूंचे आज्ञापालन करणे हीच गुरुभक्ती आहे ! धर्माच्या अधिष्ठानाशिवाय राष्ट्र ही संकल्पना पूर्ण होऊच शकत नाही. संघटनाशिवाय सध्याच्या काळात कार्य होऊच शकत नाही, त्यामुळे विविध हिंदू संघटनांशी हिंदूंनी जोडणे आवश्यक आहे. वैदिक सनातन धर्माचा प्रसार संपूर्ण देशभर करणे हे आपले दायित्व आहे. आद्य सनातन धर्माचे तत्वज्ञानच पुढे कामी येणार आहे, हे लक्षात घेतले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधीकरणाचे न्यायिक सदस्य (सेवानिवृत्त) ह.भ.प.डॉ.मदन महाराज गोसावी यांनी माटुंगा येथे आयोजित केलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात केले. तर सी.के.पी.हॉल, ठाणे (प.) येथील महोत्सवात ‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई मार्गदर्शन करताना म्हणाले, ‘विविध उद्योगसंस्था आणि व्यावसायिक मंचांच्या माध्यमातून सनातन संस्थेद्वारा सांगितलेला गुरुकृपायोगानुसार साधनेचा विषय आम्ही उद्योजकांपर्यंत पोचवत असून अनेक उद्योजक त्याचा लाभ घेत आहेत. उद्योग, कुटुंब आणि समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी गुरुकृपायोगानुसार साधना करणे ही आजच्या काळाची गरज आहे. कोपरखैरणे येथील महोत्सवात स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर म्हणाले, धर्मांतर बंदी कायद्याची सध्या गरज असून त्याची कठोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे तसेच हिंदूंचे एकत्रितकरणाचीही प्रकिया केली पाहिजे, ही काळाची आवश्यकता आहे, या ठिकाणी हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ता डॉ.उदय धुरी यांनीही मार्गदर्शन केले.



