नागरिकांनी खादीचा वापर वाढवावा – जिल्हाधिकारी आशिष येरेकर कुटीर महोत्सवाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन
अमरावती, प्रतिनिधी : शासनाने खादीच्या वापराला चालना देण्यासाठी विविध उपाययोजना केली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनाही एक दिवस खादीचे कापड घालणे बंधनकारक केले आहे. खादी उद्योगाच्या विकासासाठी नागरिकांनी खादीचा वापर वाढवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले.
राष्ट्रीय हातमाग दिनाच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसीमधील कस्तुरबा सोलर खादी महिला समितीच्या कुटीर महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे, उद्योग सहसंचालक नीलेश निकम यांच्यासह कस्तुरबा खादी महिला समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने हातमाग, खादी, सौर खादी तसेच पर्यावरणपूरक वस्त्रांना प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण, आदिवासी महिलांच्या कौशल्याला सक्षम बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. कुटीर महोत्सव दि. 30 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी हातमाग व खादी ही केवळ वस्त्रनिर्मितीची परंपरा नसून ग्रामीण अर्थव्यवस्था, स्थानिक रोजगार आणि आत्मनिर्भरतेचा मजबूत आधार आहे. नागरिकांनी खादीचा वापर वाढविल्यास या क्षेत्राला सक्षम करण्यासाठी हातभार लागणार आहे. शासनाने खादी उद्योगाला सक्षम करण्यासाठी क्लस्टरची निर्मिती केली आहे. शासनाच्या वतीने या क्लस्टरला सक्षम करण्यासाठी सर्वोतोपरी मदत केली जाणार आहे, असे प्रतिपादन केले.
कुटीर या ब्रँडच्या माध्यमातून सौर ऊर्जेवर चालणाऱ्या चरख्याद्वारे तयार होणारे सूत, खादी आणि सौरवस्त्र, तसेच हातमागावर तयार होणाऱ्या विविध उत्पादनांना आधुनिक डिझाइन आणि बाजारपेठेशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या उपक्रमातून ग्रामीण व आदिवासी महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असून, पारंपरिक कौशल्याला आधुनिक बाजारपेठेची जोड मिळत आहे.
कुटीर महोत्सवाच्या उद्घाटनानंतर जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी सोलार चरखा, धागा तयार करण्याची प्रक्रिया, कापडावरील रंगकाम, एम्ब्रॉयडरी, कापडावरील प्रिटींग आदीची पाहणी करून माहिती घेतली.