महा वॉकेथॉन: वॉक फॉर वॉटर २०२६’ च्या माध्यमातून माती व पाण्याचे महत्त्व सांगत एक पाऊल जलसंपन्न महाराष्ट्र घडविण्यासाठी पडल्याची भावना मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केली
महा वॉकेथॉन: वॉक फॉर वॉटर २०२६’ च्या माध्यमातून माती व पाण्याचे महत्त्व सांगत एक पाऊल जलसंपन्न महाराष्ट्र घडविण्यासाठी पडल्याची भावना मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केली
, मुंबई प्रतिनिधी-‘महा वॉकेथॉन: वॉक फॉर वॉटर २०२६’ च्या माध्यमातून माती व पाण्याचे महत्त्व सांगत एक पाऊल जलसंपन्न महाराष्ट्र घडविण्यासाठी पडल्याची भावना मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केली. यावेळी मंचावर विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर, गायक संजू राठोड आदी उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जलसंधारणातील उल्लेखनीय कार्याच्या स्मरणार्थ २१ ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिन ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्याचे शासनाने ठरविले असून त्याअंतर्गत ‘महा वॉकेथॉन’ हा राज्यव्यापी उपक्रम राबविण्यात आला. या अभियानास सेलिब्रेटी, तरुणाई, सामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
माती जपा, पाणी वाचवा आणि सुरक्षित महाराष्ट्र घडवा, या संदेशातून राज्यव्यापी ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुमारे तीन लाखांहून अधिक नागरिकांनी यात सहभाग घेतला. माती आणि पाणी संवर्धनासाठी लोकसहभाग वाढविण्याच्या उद्देशाने मृद व जलसंधारण विभागाने हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. माती आणि पाणी हे राज्याच्या भवितव्याशी निगडित विषय असून, त्यांच्या संवर्धनासाठी शासनाच्या प्रयत्नांना जनतेची साथ मिळणे आवश्यक आहे. विशेषतः युवकांनी या विषयाशी जोडले जाऊन जलसंधारणाच्या चळवळीला बळ द्यावे. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांनी जलसंधारणाच्या कामांना संस्थात्मक स्वरूप देत ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या विचाराला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप दिले – मंत्री संजय राठोड
***हा अभिनव उपक्रम कौतुकास्पद आहे. पाणी ही प्रत्येकाची गरज असून जात-धर्माच्या पलीकडे जाऊन जलसंधारणाचा विचार जनमानसात रुजविणे आवश्यक आहे. राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद ही भविष्यातील पिढ्यांसाठी जलसंधारणाची लोकचळवळ उभी राहण्याची आशादायी सुरुवात आहे – उपसभापती सचिन अहिर
***पावसाचे पाणी वाहून जाताना सुपीक मातीही वाहून जाते आणि पाणी जमिनीत मुरत नाही. त्यामुळे जल व मृदसंधारणासाठी लोकसहभाग वाढविणे गरजेचे आहे. भविष्यातील पिढ्यांसाठी सुपीक जमीन आणि पाण्याची शाश्वत व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने जलसंधारणाच्या कामात सहभागी व्हावे. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांना हीच खरी आदरांजली ठरेल – राज्यमंत्री इंद्रनील नाईक
***या उपक्रमाचा शुभारंभ आरे दुग्ध वसाहतीजवळ सागरी किनारा रस्त्यालगत प्रोमोनेट येथून झाला. यावेळी माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. माती व जलसंधारणाच्या संवर्धनासाठी उपस्थितांना शपथ देण्यात आली. यानंतर महा वॉकेथॉनची झेंडी दाखवून मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. अभिनेता पुष्कर श्रोत्री, क्रिकेटर इरफान पठाण, जॅकी भगनानी, रजनीश दुग्गल, संजीव-श्रवण, अनिल सिंग, झहीर शेख, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, ग्रामविकास विभागाचे सचिव श्रीकांत पुलकुंडवार, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थींनी, स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक, सांस्कतिक, कला, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. तीन किलोमीटरच्या महा वॉकेथॉनमध्ये सर्व मान्यवरांनी सहभागी होत उत्साह वाढवला. ईश्वरी चिठ्ठीच्या माध्यमातून सहभागींना बक्षीस वितरण करण्यात आले.