
भारतात ओमिक्राॅन विषाणूचा शिरकाव झाल्याने राज्य सरकारकडून सूचना, दोन मास्क वापरणे आवश्यक..!
मुंबई प्रतिनिधी : भारतात ओमिक्राॅन विषाणूचा शिरकाव झाल्याने राज्य सरकारकडून अधिक खबरदारी बाळगली जात आहे. अशात राज्याच्या कोविड टास्क फोर्सकडूनही सरकारला विविध सूचना केल्या जात आहे. ओमिक्राॅन हा कोरोनाचा नवीन विषाणू अधिक झपाट्याने पसरणारा असून त्याचा संसर्ग रोखण्यासाठी दोन मास्क वापरणे गरजेचे असल्याचे मत कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केले आहे.
भारतात ओमिक्राॅनचे जे दोन रुग्ण आढळले, त्यांच्या संपर्कातील नागरिकांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. दक्षिण आफ्रिकेत आता ओमिक्राॅन बाधित रुग्णांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढत असले तरी आयसीयूतील रुग्ण वाढलेले नाहीत. ही एक दिलासादायक बाब आहे. पुढील तीन ते सहा आठवड्यात नेमके चित्र स्पष्ट होईल, असे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले. तसेच, ओमिक्राॅनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळांवरच जास्त निर्बंध लादले पाहिजे, असेही डॉ. जोशी म्हणाले.लसीकरणामुळे कोविड होत नाही असे नाही; मात्र त्यामुळे तीव्र आजाराची शक्यता कमी होते. कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लशी ओमिक्रॉनवर प्रभावी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे तातडीने लसीकरण होणे गरजेचे आहे. ओमिक्राॅनविरोधात डबल मास्किंग व डबल लसीकरण हेच सूत्र पाळायला हवे, असे डाॅ. जोशी म्हणाले.ओमिक्रॉन संशयितांवर १८ रुग्णालयांमध्ये उपचार ओमिक्रॉनचा प्रसार अटकावासाठी पालिकेने जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यात ओमिक्रॉनच्या संशयितांसाठी १८ ठिकाणी संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येणार आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या तपासण्या बहुतांश परदेशी प्रवाशांच्या करण्यात येत आहेत. त्यात कोविड पॉझिटिव्ह आल्यास त्याला संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जात आहे. त्यासाठी १८ रुग्णालये निश्चित करण्यात आली आहेत. दरम्यान, राज्य कोविड टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ओमिक्राॅनला रोखण्यासाठी पुन्हा मूलभूत गोष्टींना प्राधान्य द्यावे लागेल. रुग्णांचे संपर्क ट्रेसिंग, चाचणी आणि उपचार करावे लागतील. प्रत्येक संशयितामागे जवळपास २०० संपर्कांच्या चाचण्या केल्या जात आहेत. या विषाणूचा व्यापक प्रसार होण्यासाठी एक किंवा दोन महिने लागू शकतात. त्यामुळे आताच पूर्ण खबरदारी बाळगायला हवी.- डाॅ. राहुल पंडित, सदस्य, टास्क फोर्स.



