
मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी जालना जिल्ह्यातील आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे निषेधार्थ तिसऱ्या दिवशीही मराठवाड्यासह राज्यात विविध ठिकठिकाणी संतप्त पडसाद उमटणे सुरूच…
राज्य प्रतिनिधी
मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी अंबड येथे येथे शुक्रवारी (ता. १) मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे रविवारी तिसऱ्या दिवशीही मराठवाड्यासह राज्यात विविध ठिकठिकाणी संतप्त पडसाद उमटणे सुरूच आहे.
बंद, रास्ता रोको, ठिय्या आंदोलने असे तिसऱ्या दिवशीच्या आंदोलनाचे स्वरूप पाहायला मिळाले. दरम्यान आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरूच आहे. शिवाय राजकीय नेत्यांच्या भेटीही सुरूच होत्या.
आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणप्रश्नी २९ ऑगस्टपासून उपोषण सुरू केले. त्यांच्या या उपोषणाला जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्ह्यांतील गोदावरी नदीकाठच्या जवळपास १३० गावांनी पाठिंबा दिला आहे. दरम्यान रविवारीही जरांगे पाटील यांचे उपोषण सुरूच होते. शासनाने आरक्षण जाहीर केल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका श्री. जरांगे पाटील यांनी जाहीर केली आहे.
लाठीमाराचे राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पुणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत आंदोलने, रास्ता-रोको करण्यात आला.
बुलडाणा जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व इतर पक्षांच्या नेत्यांनी रस्त्यांवर उतरत आंदोलन केले. वाशीम जिल्ह्यांतही रास्ता रोको, कडकडीत बंद पाळण्यात आला.
मराठा आंदोलकांवरील लाठीहल्ला हा दुर्दैवी आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीत दोषी आढळलेल्यांना निलंबित करू. जालना पोलिस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवत असून जालन्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलडाणा येथे (ता. ३) ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात सांगितले



