
विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड सेवानिवृत्त**सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी काम केले- मधुकरराजे अर्दड*
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी
आपल्याकडे अडचण घेऊन येणारा प्रत्येक सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्यांची अडचण सोडविण्यासाठी काम केल्याची भावना विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड यांनी व्यक्त केली. सर्वसामान्य माणसाच्या विकासासाठी काम करणारे अधिकारी अशी ओळख असणारे श्री. अर्दड आज (31 मे) रोजी नियत वयोमानानूसार सेवानिवृत्त झाले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित निरोप समारंभाच्या कार्यक्रमात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, उपायुक्त जगदिश मिनीयार, विभागीय आयुक्त श्री. अर्दड यांच्या पत्नी छायाताई व मुलगी अपेक्षा यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
श्री.अर्दड म्हणाले, आपण अधिकारी म्हणून काम करताना शासन व नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करत असतो. प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून लोकसेवा करण्याची ही एक संधी असते. येणाऱ्या प्रसंगात तसेच संकटावर मात करण्यासाठी शांतपणे विचार करुन निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. आपल्याला प्रत्येक प्रसंगात काम करताना सर्वांचे सहकार्य मिळाले. आपण नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर, मुंबई येथे विविध पदावर काम केले असल्याचे सांगताना श्री. अर्दड यांनी सेवा कालावधीतील प्रसंगानिहाय आपले अनुभव विषद केले.
मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी आपले मनोगत व्यकत् केले, विभागीय आयुक्त श्री.अर्दड यांनी
शहर पाणीपुरवठा योजनेसाठी भरीव योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, उपायुक्त जगदिश मिनीयार, सुरेश वेदमुथा, हिंगोलीचे अप्पर जिल्हाधिकारी कुशालसिंह परदेशी, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांच्यासह विविध अधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती नयना बोंदर्डे यांनी केले.
00000



