महिला सुरक्षितता सर्व्हेक्षण करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी:- जिल्ह्यात महिलांची कामाच्या ठिकाणी, कुटुंबात, सार्वजनिक ठिकाणी कितपत सुरक्षितता आहे तसेच त्याबद्दल महिलांना काय वाटते याबाबत सर्व्हेक्षण करुन जिल्हा महिलांसाठी सुरक्षित रहावा यासाठी उपाययोजना राबवाव्या,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.
जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक आज पार पडली. जिल्हा महिला बालविकास अधिकारी रेश्मा चिमंद्रे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे, पोलीस निरीक्षक तेजश्री पाचपुते, सहा. पोलीस निरीक्षक आरती जाधव, प्रकल्प अधिकारी चेतना मोरे, डॉ. बी.एस. लांजेवार, माविमचे समन्वयक चंदनसिंग राठोड, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक मंगेश केदारे तसेच अशासकीय सदस्य आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, महिलांना घरी,सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी सुरक्षित वाटावयास हवे. त्यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत विविध योजनांच्या माध्यमातून त्यांना समुपदेशन, सहाय्य इ. दिले जावे. पिडीत महिलांचे पुनर्वसन केले जावे. महिलांना आर्थिक स्वावलंबी करण्यासाठीच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी संयुक्त प्रयत्न करावेत. जिल्ह्यातील महिलांना खरोखर सुरक्षित वाटते का? याबाबत महिलांचे सर्व्हेक्षण करुन त्यानंतर उपाययोजना राबवाव्या,असे निर्देशही जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.०००००