महारेशीम अभियानांतर्गत रेशीम शेतीची-माहिती घेऊन इच्छुकांनी लाभ घ्यावा- उपजिल्हाधिकारी (रोहयो) दीपक शिंदे जिल्ह्यात महारेशीम अभियान 2025 चा शुभारंभ…
सांगली, प्रतिनिधी(जि. मा. : महारेशीम अभियान 2025 अंतर्गत तुती लागवड करून रेशीम उद्योग करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. तरी या अभियानांतर्गत रेशीम शेतीचे महत्त्व व त्यातून मिळणाऱ्या शाश्वत उत्पन्नाची माहिती घेऊन इच्छुकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (रोहयो) दीपक शिंदे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे महारेशीम अभियान रथाला हिरवा झेंडा दाखवून अभियानाचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी सहायक नियोजन अधिकारी उदय पवार, जिल्हा रेशीम अधिकारी राजेश कांबळे, वरिष्ठ तांत्रिक सहायक सुनिल पाटील, वरिष्ठ क्षेत्र सहायक बी. डी. माने आदि उपस्थित होते. महारेशीम अभियान 2025 हे दि. 9 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2025 या कालावधीत राबवण्यात येणार असून, यामध्ये सन 2025-26 साठी रेशीम शेती प्रचार प्रसिध्दीसह नवीन शेतकरी नोंदणी करण्यात येणार आहे.
दीपक शिंदे म्हणाले, रेशीम संचालनालयाद्वारे जिल्ह्यातील रेशीम उद्योग वाढीसाठी रेशीम विभागास 200 एकर, कृषि विभागास 300 एकर व जिल्हा परिषदेस 200 एकर असे मिळून एकूण 700 एकरचा लक्षांक देण्यात आला आहे. जिल्हा रेशीम कार्यालयातर्फे तुती लागवडीव्दारे रेशीम कोष उत्पादन योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राबविण्यात येत आहे. यामध्ये लाभार्थी निवडताना, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जमाती, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे, महिला प्रधान कुटुंबे, शारीरिक अपंगत्व प्रधान कुटुंबे, भुसुधार योजनेचे लाभार्थी, कृषी कर्ज माफी योजनेनुसार अल्प भुधारक सीमांत शेतकऱ्यांना निवडण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत रेशीम विकास प्रकल्पासाठी 3 वर्षाच्या कालावधीत अकुशल व कुशल मजुरी देण्यात येते. यामध्ये तुती लागवड व जोपासनेसाठी 682 मनुष्य दिवस व कीटक संगोपन गृहासाठी 213 दिवस असे एकूण 895 दिवसांची देण्यात येते. स्वतः मजूर म्हणून स्वतःच्या शेतात काम करणे आवश्यक आहे. सध्या प्रति एकर 3 वर्षाकरिता एकूण 4 लाख 18 हजार 815 रूपये इतके अनुदान देण्यात येते.
लाभार्थी निवडताना इच्छुक लाभार्थीकडे मध्यम ते भारी व पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी, नवीन तुती लागवड क्षेत्रासाठी सिंचनाची पुरेशी सोय उपलब्ध असणे आवश्यक आहे. एकरी वार्षिक सर्व खर्च वजा जाता किमान 1 लाख 50 हजार रूपये उत्पन्न निश्चित मिळते. जिल्ह्यात रेशीम शेती उद्योगासाठी खूप वाव आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी राजेश कांबळे व वरिष्ठ तांत्रिक सहायक सुनिल पाटील यांनी यावेळी केले.000