अपघातास कारणीभूत विजेचे खांब आणि रोहित्रांबाबत अधिक्षक अभियंता, आयुक्तांना नोटीसअन्यथा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार – अॅड. ईश्वर बिल्होरे…
जालना । प्रतिनिधी – जालना शहरातील रस्त्यांवर मधोमध असलेले विद्युत खांब व रोहित्रांमुळे होणार्या वारंवार अपघातांच्या पार्श्वभूमीवर हिंदू महासभेचे देवगिरी प्रांत प्रमुख अॅड. ईश्वर शिवाजीराव बिल्होरे यांनी महावितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता प्रभाकर सरक व महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. 30 दिवसांच्या आत विद्युत खांब व रोहित्र रस्त्याच्या बाजूला हलवण्याची मागणी केली आहे. अन्यथा, भविष्यातील अपघातांसाठी संबंधित अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
यासंदर्भात उभय अधिकार्यांना पाठवलेल्या आरपीडीए कायदेशीर नोटीसमध्ये अॅड. बिल्होरे यांनी रस्त्याच्या विकासकामांमधील निष्काळजीपणा, अपघातांची जबाबदारी, विकासाच्या नावाखाली भेदभाव, नागरिकांच्या जीवितास धोका आदी मुद्द्यांकडे लक्ष वेधले आहे. जालना शहरात सिमेंट रस्त्यांचे विकासकाम सुरू असताना विद्युत खांब व रोहित्र रस्त्याच्या मध्यभागीच सोडून दिल्याने रहदारीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. हे खांब रस्त्याच्या कडेने हलवले गेले नाहीत, ज्यामुळे अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. शहरातील विद्युत खांबांमुळे झालेले अपघात हे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे परिणाम आहेत. अनेक नागरिकांनी यामध्ये प्राण गमावले आहेत, तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. रस्त्याच्या आड येणारे झाडे व गरीब नागरिकांची घरे तात्काळ हटवली जातात, मात्र रस्त्याच्या मध्यभागी असलेले खांब व रोहित्रांना हलवले जात नाही. या खांबांमुळे शाळकरी मुले, तरुण, व सामान्य नागरिकांना मोठा धोका निर्माण झाला असून भविष्यातही गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे नमूद करून शहराच्या विकासाच्या नावाखाली प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचे जीव संकटात आले आहेत. विद्युत खांब आणि रोहित्र योग्य ठिकाणी हलवून नागरिकांसाठी सुरक्षित रस्त्यांची निर्मिती करणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. 30 दिवसांच्या आत विद्युत खांब व रोहित्र रस्त्याच्या बाजूला न हलविण्यास भविष्यातील अपघातांसाठी महावितरणचे मुख्य अभियंता आणि महापालिका आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा अॅड. बिल्होरे यांनी दिला आहे. शहरवासीयांनी या विषयावर जागरूक राहून प्रशासनाला कारवाईस भाग पाडावे, असे आवाहनही अॅड. बिल्होरे यांनी केले आहे.