पाण्याची आवर्तने देताना कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या-जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
राज्य प्रतिनिधी -सातारा द-यावर्षी पाऊस चांगला झाल्याने धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. त्यामुळे पाण्याची मागणी गतवर्षीपेक्षा कमी आहे. अशावेळी अधिक प्रभावी पद्धतीने सिंचन कसे होईल यासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. धरणात जे पाणी वितरणासाठी उपलब्ध आहे त्या प्रमाणात पाणी आवर्तणे द्यावीत, यात कोणताही अडथळा, वाद-विवाद होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.
सातारा सिंचन मंडळ, साताराची रब्बी हंगाम सन २०२४-२५ कालवा सल्लागार समिती बैठक जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोयनानगर, ता. पाटण जि. सातारा या ठिकाणी संपन्न झाली. बैठकीला पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, आमदार सर्वश्री महेश शिंदे, अतुल भोसले, सचिन पाटील, मनोज घोरपडे, सुहास बाबर, शंकर मांडेकर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हणमंत गुणाले, अधीक्षक अभियंता अरुण नाईक, जयंत शिंदे यांच्यासह कालवा सल्लागार समितीचे अशासकीय सदस्य उपस्थित होते.
धोम, धोम बलकवडी, कण्हेर, उरमोडी व तारळी या ५ मोठ्या सिंचन प्रकल्पांचा दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ चा उपयुक्त पाणीसाठा ४०.७३ TMC (१००%) आहे. गतवर्षी या प्रकल्पांचा दिनांक १५ ऑक्टोबर२०२३ चा उपयुक्त पाणीसाठा ३१.०५ TMC (७६.२३%) होता. १० फेब्रुवारी २०२५ अखेर या पाचही प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा 30.77 टीएमसी म्हणजेच 76टक्के उपलब्ध आहे. यावर्षी पर्जन्यमान पुरेसे झाल्यामुळे पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. याचा आढावा घेऊन राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, धरणात जे पाणी वितरणासाठी उपलब्ध आहे, ते लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊन जलसंपदा विभागाने वितरित करावे.
ते म्हणाले, ज्या भागांमध्ये धरणे आहेत, सिंचनाची व्यवस्था आहे, त्या भागांमध्ये अधिक प्रभावीपणे सिंचन झाले पाहिजे. शेतकऱ्यांना सुयोग्य पद्धतीने पुरेशा प्रमाणात पाणी मिळाले पाहिजे. ही अपेक्षा रास्त आहे. पण नव्याने जे क्षेत्र सिंचनाखाली येत आहे त्यांनाही पाणी देणे आवश्यक आहे. हे पाणी कोणाच्याही वाट्याचे पाणी कपात करून दिले जात नाही, तर जे पाणी आपण अतिरिक्त निर्माण करत आहोत, त्याचे नियोजन करून दुष्काळी भागाला पाणी दिले पाहिजे. यामुळे शेतीला पाण्याबरोबरच तरुणांना रोजगार ही निर्माण होणार आहे.
जी धरण कालवे जुनी झाली आहे त्यांच्या पुनर्जीवनाची आवश्यकता व्यक्त करून त्या दृष्टीने महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम (एमआयटी) मध्ये कन्हेर नेर मध्यम प्रकल्प दोन यासाठीच्या कामांसाठी चे काही प्रस्ताव घेतलेले आहेत. सातारा जिल्ह्यात यासाठी 1210 कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.
जलसंपदा अंतर्गत येणाऱ्या महामंडळा बाबत बोलताना विखे पाटील म्हणाले, महामंडळानेही आपल्या स्तरावरून निधी उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण केले पाहिजेत. त्यांची स्वायत्ताता टिकली पाहिजे. पुरेसा निधी उपलब्ध व्हावा आणि शेतकऱ्यांसाठीचे हे पाण्याचे सर्व प्रकल्प पूर्ण व्हावेत यासाठी हे आवश्यक आहे.