मराठवाडा पाणी परिषद पाण्याचे व्यवस्थापन गरजेचे-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी- नैसर्गिक स्रोत लक्षात घेऊन पाण्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. एखाद्याने आर्थिक उधळपट्टी केली तर आपण पाण्यासारखा पैसा खर्च केला असे म्हणतो. आता पुढील काळात पैशासारखे तोलूनमापून पाणी खर्च करा असे म्हणावे लागेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.दिलीप स्वामी यांनी केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि संशोधन संस्था व मालवीय मिशन टीचर्स ट्रेनिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आज मराठवाडा पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले. नाट्यगृहात आयोजीत या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते झाले. कुलगुरू डॉ.विजय फुलारी अध्यक्षस्थानी होते. गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास संशोधन संस्थेचे संचालक डॉ उपेंद्र कुलकर्णी,प्रा.संजय सांळुके व मालवीय मिशन टीचर्स ट्रेनिंग सेंटरचे संचालक प्रा.सतीश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्र-कुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, जलदूत किशोर शितोळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.दिलीप स्वामी म्हणाले, निसर्गाने माणसाला उपलब्ध करुन दिलेल्या जसे की जल, भूमी, झाडे या बाबींकडे माणसाचे दुर्लक्ष होत आहे. नैसर्गिक स्त्रोत विचारात घेऊन पाण्याचे व्यवस्थापन केले पाहिजे. विशेषतः घरगुती वापरासाठी तोलून मापून पाणी वापरले पाहिजे. गेल्या काही वर्षात शासन, सेवाभावी संस्था, विद्यापीठे एकत्रित येऊन जल-भूमी यावर उत्तम कार्य करीत असल्याचेही स्वामी यांनी सांगितले. पाण्याच्या व्यवस्थापनासोबत गावोगावी वडाची झाडे लावण्याचा उपक्रम राबविण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘पाणलोट विकासाची तत्वे – लेखक – डॉ.सतीश पाटील व डॉ.चंद्रशेखर पवार, महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण उपजीविकेवर बांबू शेतीचा सामाजिक, आर्थिक प्रभाव (संशोधन प्रकल्पाचे पुस्तक) – डॉ.संजय साळुंके, जलव्यवस्थापन महाराष्ट्राच्या शाश्वत विकासाचा ध्यास लेखक – डॉ.डी.बी.पानसकर या तीन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. डॉ.उपेंद्र कुलकर्णी व डॉ.उषा वाटाणे यांनी पुस्तकावर भाष्य केले.
अध्यक्षीय समारोपात कुलगुरु डॉ.विजय फुलारी म्हणाले, निसर्गावर मात करण्याच्या वृत्तीमुळे निर्सगाचा ऱ्हास होत आहे. जलयुक्त शिवार, जलयुक्त गाव आदी उपक्रमांमुळे पाणी बचतीचे महत्व अधोरेखित झाले. ’जीएमएनआरडी’च्या वतीने राबविण्यात येत असलेले उपक्रम व अभ्यासक्रमांची माहिती डॉ.संजय साळुंके यांनी प्रास्ताविकात दिली. तर पाणी परिषदेच्या अहवाल राज्यशासनास पाठविण्यात येर्ईल, असे डॉ.सतीश पाटील यांनी सांगितले.
प्रारंभी रोपांना पाणी घालून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. डॉ.मुस्तजिब खान सांनी सूत्रसंचालन प्रा.शैलेश माकणीवकर यांनी आभार मानले. समारोप्रसंगी माजी न्यायमूर्ती अंबादास जोशी, कुलपती नामनिर्देशीत व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. गजानन सानप यांची प्रमुख होती. या परिषदेत दिवसभरात संशोधक, विद्यार्थी, अभ्यासक, संस्थांचे प्रतिनिधी अशा एक हजारहून अधिक प्रतिनिधींचा सहभाग राहिला.
या परिषदेत दिवसभर चार सत्रात मंथन करण्यात आले यामध्ये भास्कर मुंडे, डॉ.अशोक तेजनकर, नरहरी शिवपुरे, संतोष जोशी, डॉ.सुहास अजगावकर यांनी अनुभव कथन केले तर तिसऱ्या सत्रात जल व्यवस्थापन – नागरी, ओद्योगिक पाण्याची विवेकी वापर, भूजल पुनर्भरण आणि जलसंधारण तंत्र, शेतीसाठी पाणी व्यवस्थापन आणि बदलत्या हवामानाला अनुकूल शेती, जलधोरणे आणि सरकारी योजना या विषयावर चर्चा झाली. यामध्ये डॉ.उपेंद्र कुलकर्णी, डॉ.अशोक तेजनकर, डॉ.दत्तात्रय रेगूलवार, डॉ.सुहास आजगावकर, प्रा.अश्विनी रांजणीकर, प्रा.कौशल्या लोंढे, नरहरी शिवपुरे, संतोष जोशी, अरविंद नरोडे, अॅड.राजेंद्र काळे, पराग सदगीर, अॅड.जयसिंग हिरे, सर्जेराव वाघ यांनी सहभाग घेतला.