मातोश्री मुलींचे वसतिगृह आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी सक्षम आधार
राज्य प्रतिनिधी-आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना सुरक्षित निवास, गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण व स्पर्धात्मक परीक्षांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नाशिक येथे मातोश्री मुलींचे वसतिगृह कार्यान्वित करण्यात आले असून, या उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या उच्च शिक्षणाच्या संधींना लक्षणीय बळ प्राप्त होत आहे.
या वसतिगृहाची स्थापना सारथी संस्था, महाज्योती संस्था तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे. या वसतिगृहामध्ये एकूण 200 विद्यार्थिनींसाठी निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये सारथी संस्थेअंतर्गत मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या लक्षित गटातील 75 विद्यार्थिनी, महाज्योती संस्थेअंतर्गत इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जाती व विशेष मागास प्रवर्गातील 75 विद्यार्थिनी तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील 50 विद्यार्थिनींचा समावेश करण्यात आलेला आहे
स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी महोत्सव योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या सुसज्ज इमारतीमध्ये सदर वसतिगृह सुरू करण्यास शासनाने मान्यता प्रदान केली आहे. महाज्योती व सारथी महामंडळामार्फत या वसतिगृहाचे सुयोग्य नियोजन व व्यवस्थापन करण्यात येत आहे.
विद्यार्थिनींसाठी वसतिगृहामध्ये सुरक्षित, स्वच्छ व प्रशस्त वातावरण उपलब्ध करून देण्यात आले असून, दैनंदिन गरजांसाठी विविध मूलभूत व आधुनिक सोयी-सुविधांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. स्नानासाठी गरम पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी सोलर हीटिंग सिस्टीम कार्यान्वित करण्यात आलेली आहे. पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी 3 वॉटर कुलर व 3 वॉटर फिल्टर बसविण्यात आले आहेत.
शैक्षणिक गुणवत्तावृद्धीच्या दृष्टीने वसतिगृहामध्ये सुसज्ज ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध असून, त्यामध्ये विविध संदर्भग्रंथ, स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक अभ्यास साहित्य, इंग्रजी व मराठी दैनिके तसेच शासनाचे ‘लोकराज्य’ मासिक वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विषयांवरील मार्गदर्शनपर शिबिरे, कार्यशाळा व व्याख्यानांचे आयोजन नियमितपणे करण्यात येते.
वसतिगृहातील विद्यार्थिनींना आर्थिक सहाय्याच्या स्वरूपात उपस्थितीच्या दिवसांनुसार दरमहा 2,800/- रुपये इतका भोजनभत्ता देण्यात येतो. तसेच महाविद्यालयीन उपस्थिती 50 टक्क्यांपेक्षा अधिक असलेल्या विद्यार्थिनींना दरमहा 800/- रुपये इतका निर्वाहभत्ता देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. या आर्थिक सहाय्यामुळे विद्यार्थिनींच्या शिक्षणातील सातत्य राखण्यास व आर्थिक अडचणी कमी करण्यास मोठी मदत होत आहे एकूणच, मातोश्री मुलींच्या वसतिगृहाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थिनींना सुरक्षित निवास, दर्जेदार शैक्षणिक सुविधा व स्पर्धात्मक वातावरण उपलब्ध होत असून, त्यांच्या उच्च शिक्षण व करिअर घडविण्यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरत आहे. शासनाच्या या प्रयत्नामुळे मुलींच्या सक्षमीकरणास चालना मिळत असून, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ही एक महत्त्वपूर्ण पायरी ठरत आहे.