नागरिकांना वापरासाठी रस्ते व पदपथ मोकळे मिळावेत याकरिता बेवारस वाहने व अनधिकृत फेरीवाले या विरोधात धडक मोहीम..
नवी मुंबई प्रतिनिधी- नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रस्ते हे रहदारीसाठी तसेच पदपथ नागरिकांसाठी खुले असणे गरजेचे आहे. तथापि अनेक ठिकाणी रस्त्यावर दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहने उभी असल्याचे दिसून येतात. त्याचप्रमाणे रस्त्यालगत व पदपथावर अनधिकृत व्यवसाय करणा-या विक्रेत्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यामार्फत नवी मुंबई शहराच्या सुनियोजित व्यवस्थापनाबाबत नियमितपणे आढावा घेतला जात असून त्यामध्ये अशाप्रकारे शहर सुव्यवस्थेला बाधा आणणा-या कुठेही उभ्या असणा-या वाहनांच्या व अनधिकृत व्यवसाय धारकांच्या होणा-या उपद्रवाविषयी चर्चा करण्यात येत असते. या बेवारस वाहनांमुळे शहर स्वच्छतेमध्ये अडथळा निर्माण होत असून याशिवाय अनधिकृत फेरीवाल्यांमुळेही स्वच्छतेला बाधा पोहचत असल्याचे दिसते. या अनुषंगाने आयुक्तांच्या वतीने अतिक्रमण विभाग व विभाग कार्यालये यांना कारवाई करण्याचे निर्देश देण्यात येत असतात.
तथापि, या विषयाकडे अधिक गांभिर्याने लक्ष देत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सर्व विभागांचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी यांना महानगरपालिका कार्यक्षेत्रात उभी असलेली बेवारस वाहने यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, 1949 मधील कलम 230 व 231 अन्वये विभाग कार्यालयांमार्फत सूचना पत्रक बजावण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ही बेवारस वाहने त्यांच्या मालकांनी स्वत:हून काढून टाकण्याबाबत अथवा हटविण्याबाबत रिक्षाव्दारे ध्वनीक्षेपकामार्फत जनजागृतीपर सूचना करावी असेही सूचित करण्यात आले आहे.
या सूचना पत्रकांचा कालावधी संपुष्टात येताच संबधित विभाग कार्यालयामार्फत ही बेवारस वाहने जप्त करुन टोईंगच्या सहाय्याने क्षेपणभूमी येथे जमा करावीत व त्यावर नियमानुसार पुढील कारवाई करावी असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
बेवारस वाहने हटविण्याप्रमाणेच अनधिकृत व्यवसाय करणारी वाहने हटविण्याचे व पदपथावर व्यवसाय करुन रहदारीस अडथळा आणणा-या अनधिकृत फेरीवाले व विक्रेते यांच्या विरोधातही मोहीम तीव्र स्वरुपात राबविण्यात येणार आहे.
नवी मुंबई शहराचा सुनियोजित आधुनिक शहर हा नावलौकिक असून त्याला बाधा पोहचविणा-या अनधिकृत घटकांविरोधातील ही मोहीम रस्ते, पदपथ यांचा नागरिकांना सुयोग्य उपयोग करता यावा या दृष्टीने महत्वाची असून याकामी सुजाण नवी मुंबईकर नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.