
*रेणूकाचार्य जयंती* श्री जगद्गुरू रेणुकाचार्य जयंती आहे. ती सर्व वीरशैवांनी भक्तिभावाने साजरी केली पाहिजे. यासाठी हा विशेष लेख.
अध्यात्मिक वार्ता –
जगातील धर्मांमध्ये वीरशैव हा एक प्राचीन धर्म मानला जातो. या धर्माला प्राचीन इतिहास असून युगायुगांची परंपरा लाभलेली आहे. इष्टलिंगधारणेच्या वीरव्रताचे प्रबोधन करणारा, शरीर हेच शिवालय असे प्रतिपादन करणारा, पंचसूतके नाकारणारा, अन्य धर्मांना विरोध न करता त्यांच्यात समन्वय साधण्याचा उपदेश करणारा, लिंगदीक्षेमध्ये वर्ण-जाति-लिंगभेद न पाळणारा, लिंगांगसामरस्यबोधक विद्येत रममाण व्हा असा उपदेश करणारा असा हा धर्म होय. या धर्मात व्यक्तीची योग्यता व उत्कट शिवभक्ती पाहून, तिच्या जातीचा विचार न करता दीक्षा दिली जाते. दीक्षेनंतर सर्वांना शिवस्वरूप मानण्यास हा धर्म सांगतो.
*धर्माने उद्योगाचे व श्रमाचे महत्त्व प्रतिपादन केले आहे. स्वकष्टार्जित संपत्ती प्रथम शिवार्पण करून नंतर गुरु-लिंग-जंगमांना आणि समाजातील दुर्बल घटकांना दान करून मग तिचा उपभोग घेण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे अन्नदेखील शिवार्पित करून, प्रथम भुकेल्यास देऊन नंतर स्वत: ग्रहण करण्यास सांगितले आहे. अशी शिकवण देणारा जो धर्म आहे त्याला ‘वीरशैव धर्म’ म्हणतात.*
वेद, अागम व उपनिषदांतून वरील तत्त्वांचे प्रतिपादन केलेले आहे. ही तत्त्वे लोकमनात बिंबवण्यासाठी शिवाच्या आज्ञेने पंच शिवगणांनी लिंगांतून प्रादुर्भूत होऊन या धर्माची प्रतिष्ठापना केली असे परंपरा मानते. हे पंच शिवगण म्हणजेच पंचाचार्य असून हेच वीरशैव धर्माचे संस्थापक होत. या शिवगणांनी अनुक्रमे कृतयुगात एकाक्षर, द्व्यक्षर, त्र्यक्षर, चतुरक्षर व पंचाक्षर या नावांनी; त्रेतायुगात एकवक्त्र, द्विवक्त्र. त्रिवक्त्र, चतुर्वक्त्र व पंचवक्त्र या नावांनी; द्वापरयुगात रेणुक, दारुक, घंटाकर्ण, धेनुकर्……🙏



