संतसाहित्य हाच जीवनाचा आधार- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी-संतांनी निर्माण केलेले साहित्य हे जीवनमूल्यांनी भरपूर असून त्यातून माणसाला जीवनात येणाऱ्या विविध समस्या – प्रसंगांना सामोरे जाण्याचे बळ मिळते. संत साहित्य हे मानवी जीवनाचा आधार आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज पैठण येथे केले.
पैठण येथे आज महसूल प्रशासन व पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने ‘संत साहित्य आणि त्याचे मानवी जीवनातील महत्त्व’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रा. डॉ. सुनिल सोनगिरे व डॉ. सुभाष महाराज खेत्रे आचार्य संतपीठ पैठण यांनी यावेळी आपले विचार मांडले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसिलदार दत्ता भारस्कर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) राजेंद्र देसले, गट विकास अधिकारी मनोरमा गायकवाड, सहाय्यक गट विकास अधिकारी राजेश कांबळे, विस्तार अधिकारी दशरथ खराद, माहिती व संवाद तज्ञ डॉ संजय वाघ, नायब तहसीलदार कैलास बहुरे, राहुल बनसोडे आदी उपस्थित होते. तहसिलदार कार्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला
डॉ. सुनिल सोनगिरे म्हणाले की, संतांची भुमि असलेल्या आपल्या महाराष्ट्रात संतांनी जीवनास मार्गदर्शक ठरणारे साहित्य निर्माण केले. त्या प्रमाणे त्यांनीही आचरण केले. विविध माध्यमांद्वारे संतांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करीत असतात. संतांच्या विचारांनुसार आचरण होणे महत्त्वाचे आहे. त्यातूनच चांगल्या आदर्शवत समाज म्हणून आपण ओळख निर्माण करु शकतो.
डॉ. सुभाष खेते म्हणाले की, संतांच्या साहित्यात माणसामध्ये आमुलाग्र बदल करण्याची क्षमता आहे. प्रत्येक माणसाने दुसऱ्या माणसाशी समानतेने ,आपुलकिने, प्रेमाने वागावे इतकी साधी सोपी पण अत्यंत महत्त्वपूर्ण शिकवण संतांनी आपल्याला दिली आहे. या शिकवणीचा अंगिकार केला तरी जगातील अनेक प्रश्न सुटू शकतील. संतांचे साहित्य माणसात करुणा निर्माण करते.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनीही यावेळी उपस्थितांशी संवाद साधला व या उपक्रमाचे महत्त्व विषद केले. शशीकांत घेर यांनी यावेळी तणावमुक्ती याविषयावर प्रात्यक्षिक दिले व ध्यान धारणा याबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक नीलम बाफना यांनी, सुत्रसंचालन किरण गाडेकर तर आभार प्रदर्शन बाळकृष्ण गव्हाणे यांनी केले.
०००००