
घर घर संविधानराज्यघटनेचा अभिमान प्रत्येकाने बाळगावा- पालकमंत्री संजय शिरसाट
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना लिहून आपल्या सगळ्यांना समता न्याय आणि अधिकार दिला आहे. या राज्यघटनेबद्दल विदेशात कमालीचा आदर आहे. आपण प्रत्येकाने या राज्यघटनेचा अभिमान बाळगायला हवा, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात घर घर संविधान अभियानांतर्गत देशभक्तीपर गितांचा कार्यक्रम आयोजीत केला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजीत या कार्यक्रमास विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी डॉ. सुचिता शिंदे, नीलम बाफना, संगिता राठोड, एकनाथ बंगाळे, रामदास दौड तसेच सर्व विभागप्रमुख व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, घरघर संविधान या अभियानाच्या माध्यमातून घरोघरी जाऊन संविधानाविषयी जागरुकता निर्माण करुन संविधानात सामान्यांच्या अधिकार कर्तव्याबाबत जाणीव जागृती करावी.जाणकारांनी संविधानाचा बारकाईने अभ्यास करावा. ही सर्वसमावेशक घटना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची आपल्याला देण आहे. या घटनेमुळेच मीही आज तुमच्या समोर उभा आहे.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले तसेच विभागीय आयुक्त गावडे यांनीही आपल्या मनोगतातून संविधानाची महती सांगितली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली.
०००००



