
दहावी निकाल रायगड जिल्ह्यातील ९६.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण: मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त
राज्य प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या दहावी परिक्षेचा निकाल मंगळवारी (दि.१३) ऑनलाईन जाहिर करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील ९६.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालात मुलांच्या तुलनेत मुलींनी बाजी मारली असून, मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९७.२६ टक्के तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९५.३१ टक्के इतके आहे. दहावी परीक्षे उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी अभिनंदन केले असून, परीक्षेत यश न मिळालेल्या विद्यार्थांनी खचून न जाता पुन्हा जोमाने अभ्यास करून यश प्राप्त करावे असा सल्ला दिला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्च, २०२५ मध्ये इयत्ता दहावीची परिक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेचा निकाल मंगळवारी मंडळाच्या संकेतस्थळांवर दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला. दहावीच्या परिक्षेसाठी रायगड जिल्ह्यातून ३५ हजार ६१२ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी ३५ हजार ३९४ विद्यार्थी परिक्षेला सामोरे गेले. यामधील ३४ हजार ६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, १ हजार ३२७ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९६.२५ टक्के इतके आहे.



