अमरावती, प्रतिनिधी: मेळघाट व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेच्या शुभ्र प्रकाशात ‘निसर्ग अनुभव’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. निसर्गप्रेमींनी 24 तास घनदाट वनातील 197 मचाणींवर बसून वन्य प्राण्यांच्या हालचाली आणि दर्शनाचा रोमांचक अनुभव घेतला.
सदर उपक्रमात सहभागी झालेल्या निसर्गप्रेमींना जेवण, नाश्ता, पिण्याच्या पाण्याची सोय, मचाणीवर सोडणे आणि आणण्याची व्यवस्था करण्यात आली. मचाणीवर बसण्यापूर्वी संबंधित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी आवश्यक सूचना आणि मार्गदर्शन केले. त्यानंतर निसर्गप्रेमींनी पाणवठ्यावर येणाऱ्या वन्यजीवांचे निरीक्षण केले.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील 3 वन्यजीव विभागात 9 वाघ, 8 बिबट, 59 अस्वल, 272 रानगवा, 409 सांबर, 125 नीलगाय प्राणी प्रत्यक्ष बघायला मिळाले. तसेच, पांढरकवडा वन्यजीव विभागात 6 वाघ, 18 अस्वल, 211 नीलगाय आणि अकोला वन्यजीव विभागात 8 बिबट, 19 अस्वल, 4 तडस व 43 नीलगाय या वन्यजीवांचे दर्शन झाले.
पूर्वी ‘प्राणीगणना’ उपक्रम आता वन्य प्राण्यांच्या शास्त्रीय अभ्यासाच्या पद्धतींचा अवलंब केल्यामुळे ‘निसर्ग अनुभव’ हा जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अकोट, गुगामल, मेळघाट वन्यजीव, तसेच अकोला व पांढरकवडा या सर्व वन्यजीव विभागांमध्ये निसर्गप्रेमींनी ऑनलाईन नोंदणी करून मचाण आरक्षित केले. या उपक्रमात मुंबई, पुणे, यवतमाळ, औरंगाबाद, नागपूर, परभणी, वाशीम, बुलढाणा, अकोला, नांदेड व अमरावती तसेच मध्यप्रदेशातील निसर्गप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ‘निसर्ग अनुभव’ कार्यक्रमात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने केलेल्या उत्कृष्ट व्यवस्थापनाबद्दल सहभागी निसर्गप्रेमींनी समाधान व्यक्त केले.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम. आदर्श रेड्डी, उपवनसंरक्षक जयकुमारन, सुमंत सोलंखे, विभागीय वन अधिकारी यशवंत बहाळे, उत्तम फड, श्री. निमजे, मनोजकुमार खैरनार, स्वप्नील बांगडे, अतुल तिखे आणि आनंद विपट यांनी ‘निसर्ग अनुभव’साठी पुढाकार घेत आहे