नोंदणी व मुद्रांक यासाठी स्वतंत्र विवाद निवारण प्राधिकरण स्थापन होणार नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांची घोषणा
ठाणे, प्रतिनिधी :- नोंदणी व मुद्रांक विवाद निवारणासाठी स्वतंत्र नोंदणी विवाद निवारण प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार असल्याची महत्त्वाची घोषणा नोंदणी महानिरीक्षक तसेच मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य, रवींद्र बिनवडे (आयएएस) यांनी पुण्यात आयोजित एका कार्यशाळेत केली. नोंदणी व मुद्रांक विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने नोंदणी विधेयक मसुदा 2025 वर सुधारणा सुचवण्यासाठी 13 जून रोजी पुणे येथे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यातील सर्व नोंदणी व मुद्रांक उपविभागातील अधिकारी-कर्मचा-यांनी विधेयकातील विविध कलमांवर मौलिक सूचना मांडल्या. यामुळे हा कायदा अधिक नागरिककेंद्रित, पारदर्शक व डिजिटलायझेशनला पूरक होण्यास मदत होईल, असे नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांनी सांगितले.
कार्यशाळेला अप्पर मुद्रांक नियंत्रक संजय चव्हाण, शासनातील अप्पर मुख्य सचिवांचे ओएसडी राजेंद्र मुठे, सहसचिव सत्यनारायण बजाज, मुद्रांक अधीक्षक अशोक पाटील, नोंदणी उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सर्वांनी सामूहिक वाचनाद्वारे मसुद्याच्या सर्व कलमांवर चर्चा केली आणि सूचनांचा समावेश करण्याचा निर्धार व्यक्त केला. नोंदणी विधेयक मसुदा 2025 हा नोंदणी कायदा 1908 चा आधुनिक स्वरूपात पुनर्रचना करण्याचा प्रयत्न असून यामध्ये डिजिटल नोंदणी, आधार-आधारित पडताळणी, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स आणि बंधनकारक दस्तऐवज यांसारख्या सुधारणांचा समावेश आहे.