नवी मुंबईत हिवताप – डेंग्यू विषयक जनजागृती शिबिरांचे प्रभावी नियोजन
नवी मुंबई प्रतिनिधी – पावसाळा कालावधी हिवताप – डेंग्यूसारखे रोग पसरविणाऱ्या डासांसाठी पोषक आहे. हिवताप – डेंग्यूसारखे रोग पसरविणाऱ्या डासांची उत्पत्ती मुख्यत्वे करुन घरांतर्गत व घराभोवताली असलेल्या स्वच्छ साचलेल्या पाण्यामधील डासउत्पत्ती स्थानांमध्ये होत असते. यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती करुन त्यांचा प्रतिबंधाकरिता सक्रीय सहभाग घेण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात विशेष प्रतिबंधात्मक मोहिमा राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून 26 जून रोजी 26 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रात जाहीर शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. त्याठिकाणी सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी, ठाणे श्रीम. स्वाती गरुडे व आरोग्य सहाय्यक, जिल्हा हिवताप कार्यालय ठाणे श्री. शंकर गडरी यांनी भेट दिली. या जाहीर शिबीरांच्या ठिकाणी असलेले अभिनव प्रदर्शन संच व आरोग्य शिक्षण देण्याची पध्दत बघून त्यांनी समाधान व्यक्त केले
26 जून रोजी आयोजित या विशेष जनजागृती शिबीरांच्या 26 ठिकाणी एकूण 11456 नागरिकांनी भेट दिली असून त्याठिकाणी 749 रक्तनमुने घेण्यात आले आहेत. अशाप्रकारे 25 एप्रिल पासून 208 जाहीर शिबीरे आयोजित करण्यात आली असून त्याचा लाभ 78,885 नागरिकांनी घेतला असून 5356 रक्तनमुने घेण्यात आलेले आहेत. 1 जानेवारी पासून 19 जून पर्यंत 76026 रक्तनमुने घेण्यात आले असून त्यामध्ये 12 हिवताप दूषित रूग्ण आढळले आहेत. तसेच 152 संशयित डेंग्यू असून एन आय व्ही पुणे/सिव्हील हॉस्पिटल येथे 55रक्तजल पाठविण्यात आलेले आहे. यामध्ये दूषित डेंग्यू रूग्ण एकही नाही.
घरातील व घराबाहेरील झाडांच्या कुंड्यांच्या खाली असलेल्या प्लेटमधील पाणी, झाकण नसलेली पाणी साठविण्याची भांडी आणि घरातील फेंगशुई अथवा शोभेच्या झाडांमध्ये साचलेले पाणी, गॅलेरीत / गच्चीवरील व घराच्या परिसरात साचलेले भंगार साहित्य, रिकाम्या बाटल्या, करवंट्या, रंगाचे डबे तसेच उघड्यावरील टायर्स, छतावरील प्लॉस्टिक कागद/ताडपत्री मधील पाणी, बांधकामाच्या ठिकाणी जमा पाणी, झाकण नसलेले ड्रम व पाण्याच्या टाक्या याठिकाणी डास उत्त्पती होत असल्याने या जागी पाणी साचून राहणार नाही याची नागरिकांनी दक्षता घ्यायची आहे.
आरोग्य विभागाच्या कार्यवाहीसोबतच नवी मुंबईकर नागरिकांनी घरातील व घराभोवतालची डासउत्पत्ती स्थाने नष्ट करणे तसेच आपले घर व परिसर स्वच्छ ठेवणे, आजुबाजूच्या परिसरातील – टेरेसवरील भंगार नष्ट करणे आदी बाबींवर लक्ष दिले तर नवी मुंबईत हिवताप, डेंग्यू आजारावर आळा घालणे शक्य होईल असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे