महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे आ. तरे यांनी घेतला जलवाहतुकीचा आढावा
विरार. (प्रतिनिधी) – मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वर दररोज होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे हाल होत असून, या समस्येवर दीर्घकालीन आणि पर्यायी उपाय शोधण्याच्या दृष्टीने आमदार विलास तरे यांनी विरार – सफाळे परिसरातील जलवाहतुकीचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला.
या पाहणी दौऱ्यात त्यांनी कोळीवाडा, समुद्रकिनारा, आणि संभाव्य जेटी उभारणीची जागा यांचा आढावा घेतला. यावेळी संबंधित कोळी समाजाचे प्रतिनिधी, आणि स्थानिक नागरिकही उपस्थित होते. यावेळी आमदार तरे म्हणाले की, “मुंबई – अहमदाबाद महामार्गावर मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक आणि वाहनांची वर्दळ होत असून, वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर समुद्रमार्गे जलवाहतूक हा एक प्रभावी पर्याय ठरू शकतो. विरार – सफाळे दरम्यान जलमार्गाने प्रवासी आणि मालवाहतूक सुरु केल्यास महामार्गावरील ताण कमी होऊ शकतो, तसेच वेळ आणि इंधन वाचविले जाऊ शकतो.” या संदर्भात तांत्रिक अहवाल तयार करण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, बंदर विभाग व इतर तज्ज्ञ संस्थांच्या सहकार्याने पुढील पावले उचलण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जलवाहतूक प्रकल्पासाठी अपेक्षित लाभ म्हणून महामार्गावरील वाहतूक कोंडीत लक्षणीय घट, वेळ व इंधनाची बचत, पर्यटनास चालना, कोळी समाजाला रोजगाराच्या नव्या संधी, पर्यावरणपूरक वाहतूक सुविधा उपलब्ध होऊ शकते. शेवटी आमदार तरे म्हणाले की, “आपण फक्त समस्येकडे बोट न दाखवता पर्याय शोधून तो अंमलात आणणे हे लोकप्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्य आहे. जलवाहतूक ही भविष्यातील गरज असून ती शक्य तितक्या लवकर प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू.”
यावेळी आमदार विलास तरे, मारंबल पाड्यातील व जलसार गावातील स्थानिक ग्रामस्थ, फेरी बोट जे व्यवस्थापक राज सोनवणे आदी कर्मचारी वर्ग उपस्थित होते