
जिल्ह्यात “राष्ट्रासाठी मध्यस्थी” विशेष मोहिमेला सुरुवात वाद नको, संवाद हवा! मध्यस्थीने सुटते गुंतागुंत, नाती राहतात जिवंत!
रायगड ( प्रतिनिधी : न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांमध्ये संवाद व सामंजस्याच्या माध्यमातून तडजोड साधण्यासाठी “राष्ट्रासाठी मध्यस्थी” (Mediation for the Nation) ही विशेष मोहिम रायगड जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार ही मोहिम दिनांक ०१ जुलै ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत जिल्हा न्यायालय रायगड व सर्व तालुका न्यायालयांमध्ये राबविली जात आहे.
या मोहिमेंतर्गत कौटुंबिक वाद, मोटार अपघात नुकसानभरपाई, धनादेश न भरल्याच्या (चेक बाऊन्स) तक्रारी, वाटप दावे, वाणिज्यिक दावे तसेच इतर सर्व तडजोडयोग्य दिवाणी व फौजदारी प्रकरणे सामंजस्याच्या माध्यमातून निकालात काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
मध्यस्थी ही न्यायालयीन प्रक्रियेपेक्षा जलद, खर्चिकदृष्ट्या कमी व गोपनीयता जपणारी पद्धत असून, यात कोणत्याही पक्षावर निर्णय लादला जात नाही. न्यायालयात प्रलंबित असलेल्या व तडजोडीयोग्य असलेल्या प्रकरणांमध्ये दोन्ही पक्ष आपसात थेट संवाद साधून सुसंवादातून आपली समस्या सोडवू शकतात.
या मोहिमेचे मार्गदर्शन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष राजेंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली होत असून, मोहिमेचा लाभ जास्तीत जास्त पक्षकारांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.मध्यस्थी मोहिमेची वैशिष्ट्ये: स्वेच्छिक सहभाग,गोपनीयता राखली जाते,वेळ आणि खर्च वाचतो,सामंजस्यातून निर्णय,
न्यायालयीन प्रक्रियेपेक्षा जलद ज्या पक्षकारांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत व ते ही प्रकरणे सामंजस्यातून मिटवू इच्छितात, त्यांनी जिल्हा न्यायालय रायगड, तालुका न्यायालय किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग येथे तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती तेजस्विनी निराळे यांनी केले आहे.
००००



