खतटंचाईचा मुद्दा गंभीर, कृषी विभागाकडून दुर्लक्ष; बळीराजा शेतकरी संघटनेचा इशारा…
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी- सध्या खरीप हंगामातील पिकांना योग्य वाढीसाठी खतांची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. मात्र शेतकऱ्यांना अद्यापही युरिया, डीएपी यासारखी नामांकित कंपन्यांची खते मिळत नसल्याची गंभीर स्थिती आहे. दुसरीकडे, काही खत विक्रेते मोठ्या प्रमाणात खतांचा साठा करून ठेवत आहेत, तर कृषी विभागाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव सोळुंके पाटील यांनी केला आहे.आज त्यांनी तालुक्यातील विविध भागांतील शेतकऱ्यांच्या शेतांवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, बाजारात नामांकित कंपन्यांची खते उपलब्धच नाहीत. जी खते शेतकऱ्यांना नको आहेत, ती जबरदस्तीने दिली जात आहेत. काही दुकानदार तर ‘खत आलेच नाही’ असे सांगून शेतकऱ्यांना परत पाठवत आहेत, तर दुसरीकडे जिथे खते उपलब्ध आहेत तिथे ती एमआरपीच्या पलीकडे विकली जात असल्याचे प्रकारही समोर आले आहेत.
शेतकऱ्यांच्या या समस्यांबाबत सोळुंके पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “कृषी विभागाचे अधिकारी खत वाटपावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरत आहेत. शेतकऱ्यांना वेळेवर व योग्य दरात खते मिळणे अत्यावश्यक आहे, अन्यथा पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. खतांची टंचाई निर्माण होऊन त्याचा फायदा दुकानदार घेत आहेत आणि सरकार डोळेझाक करत आहे. ही बाब शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी घातक ठरू शकते,” असे त्यांनी स्पष्ट केले.
जर लवकरच ही परिस्थिती सुधारली नाही आणि खताचा नियमित व पारदर्शक पुरवठा सुरू झाला नाही, तर अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्यावतीने जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा तीव्र इशारा शिवाजीराव सोळुंके पाटील यांनी दिला आहे. कृषी विभाग आणि प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी उपस्थित शेतकरी वर्गाकडूनही करण्यात आली.