मुरुड येथील आमदार रमेशआप्पा कराड यांच्या जनता दरबारला अभूतपूर्व प्रतिसाद,प्रलंबित समस्यांचा जनता दरबारात नागरिकांनी वाचला पाढा
राज्य प्रतिनिधी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न, व्यथा आणि अडीअडचणी समजून घेता याव्या त्यांच्याशी संवाद करता यावा यासाठी लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेशआप्पा कराड यांनी लातूर तालुक्यातील मौजे मुरुड येथे आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबार मध्ये वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या समस्यांचा नागरिकांनी पाढाच वाचला. या सर्व प्रश्नांची गांभीर्याने दखल घेऊन जे शक्य आहेत ते प्रश्न जागेवरच त्यांनी सोडविले. इतर प्रश्न संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याकडे देऊन तात्काळ कारवाई करून निकाली काढण्याच्या सूचना आमदार महोदयांनी दिल्या. तब्बल साडेपाच ते सहा तास सुरू असलेल्या या जनता दरबारास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
लातूर तालुक्यातील मौजे निवळी, चिंचोली बल्लाळनाथ, काटगाव, एकुर्गा, गादवड या जिल्हा परिषद मतदार संघासह मुरुड शहर या कार्यक्षेत्राचा जनता दरबार दि 25 जुलै शुक्रवार रोजी मुरुड येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेशआप्पा कराड यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे, गटविकास अधिकारी श्याम गोडभरले, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेशकुमार राऊत, भाजपाचे विक्रमकाका शिंदे, प्रदीप पाटील खंडापूरकर, भागवत सोट,मुरुडच्या सरपंच श्रीमती अमृताताई नाडे, उपसरपंच हनुमंतबापू नागटिळक, मंडल अध्यक्ष सुरज शिंदे, प्रताप पाटील, मुरुड शहराध्यक्ष वैभव सापसोड आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थित होती. यावेळी विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या दहा पंधरा वर्षात गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांना आमदार साहेबांना भेटता आले नाही, आपले प्रश्न अडीअडचणी त्यांच्याकडे मांडता आल्या नाहीत. लातूर ग्रामीण मतदार संघातून निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार श्री रमेशआप्पा कराड यांनी ज्यांचा कोणी वाली नाही त्याला न्याय देण्याची भूमिका घेऊन, जनतेच्या अडीअडचणी, प्रश्न समजून घेण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी मुरुड येथे जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. अभूतपूर्व प्रतिसाद मिळालेल्या या जनता दरबारमध्ये उपस्थित ग्रामीण भागातील नागरिकांनी वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या समस्या, गऱ्हाणे मुक्तपणे मांडून निवेदनाचा पाऊसच पडला.