सोलापूर आरटीओ कार्यालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय-तालुक्यात वाहन परवाना..
राज्य प्रतिनिधी-सोलापूर आरटीओ कार्यालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, आता वाहनचालकांना परवाना मिळवण्यासाठी सोलापूर शहरात जाण्याची गरज उरलेली नाही. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात वाहन परवाना तपासणीसाठी मोहीम राबवली जाणार आहे. याद्वारे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणीच परवाना तपासणीसाठी सुविधा मिळणार आहे. ही व्यवस्था तेवीस जुलैपासून सुरू करण्यात आली आहे.
या अंतर्गत प्रत्येक तालुक्याचे ठराविक दिवशी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उदा. मंगळवेढा येथे प्रत्येक महिन्यातील पहिला, दुसरा आणि तिसरा सोमवार, मंद्रूप-बोरामणी येथे शेवटचा सोमवार, पंढरपूर येथे प्रत्येक मंगळवार व बुधवार, बार्शी येथे प्रत्येक गुरुवार, अक्कलकोट येथे पहिला व तिसरा शुक्रवार, तर मोहोळ येथे दुसरा व चौथा शुक्रवार या दिवशी परवाना तपासणी होईल. हे सर्व ठिकाणी आरटीओ कार्यालयाचे अधिकारी उपस्थित राहतील.दरमहा एकशे ऐंशी शिकाऊ परवाने व दोनशे चाळीस पक्के परवाने देण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचे आरटीओ विभागाने सांगितले. यामुळे हजारो नवोदित वाहनचालकांना सोयीस्कररीत्या लायसन्स मिळणार आहे. आरटीओकडून असेही सांगण्यात आले आहे की, जे नागरिक शिकाऊ परवाना घेतात, त्यांनी सहा महिन्यांच्या आत पक्क्या परवान्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. मुदतीत अर्ज न केल्यास पुन्हा प्रक्रियेची सुरुवात करावी लागेल.
वाहन परवाना नसताना वाहन चालविल्यास यापुढे कडक कारवाई केली जाणार आहे. वाहनधारकांकडून पाच हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार असून, अल्पवयीन वाहनचालक आढळल्यास त्यांच्या पालकांवरही दहा हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. या प्रकरणी गुन्हाही नोंदवण्यात येणार आहे.
परवाना मिळवण्यासाठी अर्जदाराने अठरा वर्षे पूर्ण केलेले असावे. अर्ज करण्यासाठी आधारपत्र, पॅन, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, वीजबिल, घरपट्टी पावती अशा कागदपत्रांची गरज भासते. अर्जदारास प्रथम संगणकीकृत चाचणी द्यावी लागते. त्यात यशस्वी झाल्यानंतरच शिकाऊ परवाना दिला जातो. पुढे पक्क्या परवान्यासाठी वाहनचालकांनी वेळेत अर्ज करणे बंधनकारक आहे.