गोकुळाष्टमीच्या निमित्ताने महाराष्ट्रभर दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा
मुंबई प्रतिनिधी-आज म्हणजे गोकुळाष्टमीच्या निमित्ताने महाराष्ट्रभर दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह विविध भागांमध्ये हजारो गोविंदा पथकांनी भाग घेऊन उत्साहाने दहीहंडी फोडली. मुसळधार पाऊस असूनही गोविंदा उत्साहात कमीच झाला नाही. ‘ढाक्कू माकूम’ आणि ‘मच गया शोर सारी नगरी रे’ हे गाणे वाद्यांवर वाजत असतानाच गोविंदा मानवी मनोरा तयार करून दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज होते.
मुंबई शहर आणि उपनगरात विविध राजकीय पक्षांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व पालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहीहंडीचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. दादर येथील आयडियल बुक डेपो जवळील साईदत्त मित्रमंडळाने देखील दहीहंडी उत्सवाला सुरवात केली आहे. महिला गोविंदा पथकांनीही उत्सवात भाग घेतला आहे. ठाण्यात शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने कॅसलमिल येथील गोकुळ हंडीचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले असून, शहरातील असंख्य गोविंदांनी आपल्या पथकांची नोंदणी करण्यासाठी रांगा लावल्या आहेत.कल्याण-डोंबिवलीमध्ये या वर्षी एकूण तीनशे पंचवीस दहीहंड्या फोडण्याचे कार्यक्रम आहेत. यामध्ये खासगी दोनशे पंच्याहत्तर आणि सार्वजनिक पन्नास हंडींचा समावेश आहे. राजकीय नेते आणि सेलिब्रिटींची उपस्थिती या उत्सवाला भरभराट देते. छत्रपती शिवाजी चौकात शिंदे-ठाकरे गटाच्या समोर असलेल्या हंडी ही विशेष आकर्षण ठरणार आहे. मोठ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर कायदा-व्यवस्था राखण्यासाठी राज्य राखीव पोलीस दल तुकडी, निरीक्षक, अधिकारी आणि सहाशेहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात केले गेले आहेत.
गोविंदांसाठी अनेक सार्वजनिक आणि खाजगी मंडळांकडून सुरक्षा आणि सुविधा यांची उत्तम व्यवस्था केली आहे. अनेक दिवसांच्या सरावानंतर आज गोविंदा मानवी मनोरा उभारून रजत दहीहंडी फोडण्याचा आनंद साजरा करतील. संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडी उत्सवाने जुन्या परंपरेतून जीवंत उत्साह पसरविला असून या सणाला लोक मोठ्या उत्साहाने सामोरे गेले आहेत.