राज्यातील दीड लाख शिक्षकांचा पगार थांबण्याची शक्यता..
राज्य प्रतिनिधी- राज्यातील सुमारे दीड लाख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आवश्यक कागदपत्रे अद्याप शासनाच्या ‘शालार्थ’ या प्रणालीमध्ये संग्रहित झालेली नाहीत. त्यामुळे शासनाने दिलेली अंतिम मुदत संपल्यानंतर अशा शिक्षकांचा पगार थांबविण्याचे आदेश वेतन अधीक्षकांनी दिले आहेत
दीड लाख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आवश्यक कागदपत्रे अद्याप शासनाच्या ‘शालार्थ’ या प्रणालीमध्ये संग्रहित झालेली नाहीत. त्यामुळे शासनाने दिलेली अंतिम मुदत संपल्यानंतर अशा शिक्षकांचा पगार थांबविण्याचे आदेश वेतन अधीक्षकांनी दिले आहेत.
नोव्हेंबर २०१२ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत रुजू झालेल्या सर्व शिक्षकांनी आवश्यक कागदपत्रे ‘शालार्थ’ प्रणालीमध्ये अपलोड करणे बंधनकारक आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांचा नियुक्ती आदेश, रुजू अहवाल, वैयक्तिक मान्यता पत्र, उपसंचालक कार्यालयातून जारी केलेले शालार्थ ओळखपत्र आदेश आदी आवश्यक कागदपत्र दिनांक १५ सप्टेंबरपर्यंत अपलोड करायची आहेत. पूर्वी ही मुदत दिनांक ३१ ऑगस्टपर्यंत होती. मात्र ती वाढवून आता १५ सप्टेंबरपर्यंत करण्यात आली आहे. दरम्यान या मुदतीनंतर कोणत्याही शाळेने दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रे सादर केली नाहीत, तर संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पुढील महिन्यापासून पगार रोखण्यात येईल. याबाबत सर्व शाळांना स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.