दिवाळीत प्रवास महागणार – राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे तिकीट दरात वाढ
राज्य प्रतिनिधी-महाराष्ट्रराज्य मार्ग परिवहन महामंडळाने दिवाळी हंगामासाठी तिकीट दरांमध्ये दहा टक्के हंगामी भाडेवाढ जाहीर केली आहे. ही वाढ दिनांक १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२५ या वीस दिवसांच्या कालावधीत लागू राहणार आहे. यामुळे एसटीच्या तिजोरीत अंदाजे एक हजार ते एक हजार शंभर कोटी रुपयांचा महसूल जमा होण्याची अपेक्षा आहे.
भाडेवाढीमुळे राज्यातील लांब पल्याच्या प्रवासात साधारणतः नव्वद ते शंभर रुपयांची वाढ होईल. उदाहरणार्थ, मुंबई-कोल्हापूर मार्गावरील तिकीट सहाशे चाळीस रुपयांवरून सातशे रुपयांपर्यंत वाढेल. मुंबई-मालवण मार्गावरील शिवशाहीची तिकीट एक हजार तीनशे रुपयांवरून एक हजार चारशे रुपयांपर्यंत वाढेल. मुंबई-जळगाव मार्गावरील स्लीपरची तिकीट एक हजार शंभर रुपयांवरून एक हजार दोनशे पन्नास रुपयांपर्यंत वाढेल.दिवाळीच्या काळात प्रवाशांची संख्या वाढते, त्यामुळे एसटी महामंडळाने दिनांक १५ ऑक्टोबरपासून वाढीव बसगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या वाढीव बसगाड्या दिनांक ५ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहतील. त्यानुसार, साधी, विठाई, शिवशाही, निमआराम या बससेवांसाठी भाडेवाढ लागू होईल. तथापि, मुंबई-पुणे मार्गावरील शिवनेरी बससेवांसाठी भाडेवाढ लागू होणार नाही.
एसटी महामंडळाने दरवर्षी दिवाळी आणि उन्हाळी हंगामात गर्दीच्या काळात उत्पन्न वाढीसाठी हंगामी भाडेवाढ केली आहे. गर्दीच्या हंगामात भाडेवाढ करण्याची एसटी महामंडळाला परवानगी आहे, आणि त्यानुसार ही तात्पुरती भाडेवाढ केली जाते.