
मुंबई विमानसेवा आता दररोज सुरू होणार जळगाव मुंबई 26 तारखेपासून सुरू होणार
राज्य प्रतिनिधी-ऑक्टोबरपासून जळगाव-मुंबई विमानसेवा दररोज सुरू होणार आहे. सध्या ही सेवा आठवड्यातून फक्त चार दिवस सुरू होती. अलायन्स एअर कंपनीच्या या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईसाठी व्यापार, उद्योग, शिक्षण, मंत्रालयीन कामकाज आणि वैद्यकीय उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते, त्यामुळे दररोज विमानसेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांना केवळ दीड तासांत मुंबई गाठता येणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, मुंबई विमानतळावरून सायंकाळी सात वाजता जळगावसाठी विमान उड्डाण घेईल आणि रात्री आठ वाजून पंचवीस मिनीटांनी जळगाव विमानतळावर पोहोचेल. त्याचप्रमाणे जळगावहून मुंबईसाठी रात्री आठ वाजून पन्नास मिनीटांन विमान उड्डाण घेईल आणि मुंबई विमानतळावर रात्री दहा वाजून दहा मिनीटांनी पोहोचेल. सध्या २६ ऑक्टोबरपर्यंत मुंबईहून जळगावसाठी रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी विमानसेवा सुरू आहे. तर जळगावरून मुंबईसाठी रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी विमानसेवा सुरू आहे. २६ ऑक्टोबरनंतर दोन्ही बाजूने दररोज विमानसेवा उपलब्ध असेल
उडान योजनेंतर्गत जळगाव विमानतळावरून गोवा, पुणे, हैदराबाद, मुंबई आणि अहमदाबाद या शहरांसाठी सध्या विमानसेवा सुरू आहे. प्रवाशांकडून मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे जळगाव-मुंबई विमानसेवा दररोज सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे जळगाव आणि मुंबई या शहरांमधील प्रवास आणखी सोयीस्कर आणि वेगवान होणार आहे. प्रवाशांना वेळेची बचत होईल आणि दोन्ही शहरांमधील संपर्क अधिक मजबूत होईल. अलायन्स एअरच्या या निर्णयामुळे उडान योजनेंतर्गत जळगाव विमानसेवा अधिक लोकप्रिय होईल आणि प्रवाशांना अधिक सुविधा मिळतील.



