शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये धैर्य, शारीरिक क्षमता निर्माण करावी- राज्यपाल हरिभाऊ बागडे* ▪️शिरूर अनंतपाळ येथे प्रभाकर कुलकर्णी गुरुजी यांचा जीवनगौरव सोहळा ▪️’असा एक प्रभाकर’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन
*शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये धैर्य, शारीरिक क्षमता निर्माण करावी- राज्यपाल हरिभाऊ बागडे*▪️शिरूर अनंतपाळ येथे प्रभाकर कुलकर्णी गुरुजी यांचा जीवनगौरव सोहळा ▪️’असा एक प्रभाकर’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन
लातूर, प्रतिनिधी : शिक्षण हेच गरिबी दूर करण्याचे साधन आहे. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये धैर्य, शारीरिक क्षमता निर्माण होण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले. शिरूर अनंतपाळ येथील मोरया लॉन्स येथे आयोजित कर्मयोगी प्रभाकर कुलकर्णी गुरुजी जीवनगौरव सोहळ्यामध्ये ते बोलत होते.
खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार विक्रम काळे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर, शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष चंद्रकला शिवणे, विवेक देशपांडे, ॲड. संभाजी पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रभाकर कुलकर्णी गुरुजी व सुमन प्रभाकर कुलकर्णी यांचा सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह देवून गौरव करण्यात आला. तसेच प्रभाकर कुलकर्णी यांच्या जीवनावर आधारित ‘असा एक प्रभाकर’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
प्रभाकर कुलकर्णी यांनी निस्पृह भावनेतून विद्यार्थ्यांना आणि समाजाला दिशा देण्याचे काम केले. त्यांचे शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील योगदान मोठे आहे. समाजासाठी त्यांनी केलेल्या कार्यातून उतराई होण्यासाठी त्यांचा जीवनगौरव सोहळा होत आहे. त्यांचे विचार आत्मसात करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा, असे राज्यपाल श्री. बागडे यावेळी म्हणाले.
मुलांना शालेय जीवनातच योग्य शिक्षण आणि योग्य संस्कार मिळाले तर त्यांची वाटचाल योग्य मार्गाने होते. त्यामुळे आपला विद्यार्थी जीवनात यशस्वी व्हावा, यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे, असे राज्यपाल श्री. बागडे यांनी सांगितले. भारतीयांकडे असलेल्या पारंपारिक ज्ञानाची ओळखही विद्यार्थ्यांना होण्याची गरज आहे. याबाबतची माहितीही त्यांना शालेय जीवनातच दिली जाणे आवश्यक आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या समृद्ध परंपरेचे महती समजण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. जीवनात यशस्वी होण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन महत्वाचा आहे. कोणत्याही कामाला कमी न समजता प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याची मानसिकता विद्यार्थ्यांमध्ये तयार व्हायला हवी. अगदी छोट्या कामापासून सुरूवात करून उच्च पदांवर पोहचलेल्या व्यक्तींची अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या प्रभाकर कुलकर्णी यांनी सुसंस्कृत पिढी घडविण्याचे कार्य केले, असे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी सांगितले.शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात काम करताना प्रभाकर कुलकर्णी यांनी कधीही तत्वाशी तडजोड केली नाही. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे आमदार विक्रम काळे म्हणाले.पुढील पिढीला योग्य दिशा देण्याचे महत्वपूर्ण काम प्रभाकर कुलकर्णी यांनी केल्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले.माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर, विवेक देशपांडे, ॲड. संभाजी पाटील यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केलेसत्काराला उत्तर देताना प्रभाकर कुलकर्णी यांनी आपला जीवनपट आणि शिरूर अनंतपाळ गावाचा इतिहास उलगडला. तसेच या परिसरातील विद्यार्थी, नागरिकांमुळे आपल्या हातून चांगले कार्य घडू शकले, असे त्यांनी सांगितले.जीवनगौरव सोहळ्यामध्ये श्री. कुलकर्णी यांना देण्यात आलेल्या सन्मानपत्राचे वाचन साहित्यिक धनंजय गुडसुरकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिरूर अनंतपाळ येथील साहित्य व संस्कृती संवर्धन मंडळाचे अध्यक्ष बालाजी येरोळे यांनी, तर सूत्रसंचालन किरण कोरे यांनी केले.