
अग्रीस्टॅक नोंदणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
अमरावती, प्रतिनिधी) : माहे सप्टेंबर 2025मधील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईचे अनुदान तात्काळ जमा करण्यात येत आहे. ही मदत बँक खात्यात जमा होण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना ‘अॅग्रीस्टॅक’ नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
कृषि, पशु संवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाच्या शासन निर्णयानुसार, सर्व शेतकऱ्यांसाठी अॅग्रीस्टॅक नोंदणी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण झाली आहे, अशांच्या बँक खात्यात सप्टेंबर 2025 मधील अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेले नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ जमा केली जात आहे. ज्या शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅक नोंदणी झालेली आहे, त्यांना ई-केवायसी करण्याची आवश्यकता नाही.
शेतकऱ्यांनी अद्याप अॅग्रीस्टॅक नोंदणी केलेली नसल्यास तात्काळ नोंदणी पूर्ण करावी. यासाठी शेतकऱ्यांनी आपला गाव नमुना नं., सातबारा उतारा आणि आधारकार्डसह आपले सरकार सेवा केंद्राशी संपर्क साधावा. केंद्रावर आपली अॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करावी आणि फार्मर आयडी प्राप्त करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी केले आहे.
00000



